Last Updated on 19 Nov 2022 7:18 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठामध्ये दर्जेदार मत्स्यालय उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी घोषणा करुन विद्यार्थिनींसाठी वसतीगृह, नावीन्यपूर्ण उपक्रम व कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांसाठीही राज्य शासनाच्या वतीने भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय डी. सावंत तर अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ गीताचे लोकार्पण करण्यात आले. या गीताचे गीतकार प्रा. गोविंद काजरेकर व प्रा. प्रविण बांदेकर व संगीतकार अमित साळोखे यांच्यासह गायक कलाकारांचा सत्कारही मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यापीठातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार अर्थशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रकाश शंकर कांबळे यांना देण्यात आला. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. आण्णा काका पाटील (कराड) यांना, तर कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉ. उषा बाहुबली पाटील (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची स्थापना करीत असताना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी छोट्यात छोट्या गावातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाची गंगा नेण्याचे स्वप्न बाळगले होते. यशवंतरावांचे ते स्वप्न विद्यापीठाने पूर्ण केलेच. शिवाय, विद्यापीठाचा लौकिक देश-विदेशांतही उंचावला. शिक्षण व संशोधनात शिवाजी विद्यापीठ आज अग्रेसर आहे. मात्र, विद्यापीठाची सामाजिक बांधिलकीही कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या कालखंडातील कार्य असो की महापूर काळात लोकांना दिलासा देण्याचे काम असो, विद्यापीठाने ही कामे अत्यंत आत्मियतेने केली. शिवाजी विद्यापीठाने गेल्या साठ वर्षांत शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर प्रगती केलीच, पण त्याच बरोबरीने सामाजिक बांधिलकीही प्राधान्याने जोपासली, असे गौरवद्गार त्यांनी काढले.
मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करण्याच्या दिशेने शिवाजी विद्यापीठाने काम करावे. या धोरणामधील विविध उच्च शिक्षणाच्या व कौशल्य विकासाच्या संधींचा विकास आणि लाभ विद्यार्थ्यांपर्यंत आणि व्यापक समाज घटकांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने काम करणे अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे डिजी लॉकरसारख्या नव तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थीभिमुखता विकसित करण्यासाठीही प्रयत्न करावेत.
शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक करून मंत्री श्री. पाटील म्हणाले, अलीकडेच शासनाने युनिसेफ समवेत एक महत्त्वाचा करार केला. याअंतर्गत जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा विकास करण्यासाठी बहुस्तरित प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून या सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने बोलताना मंत्री श्री. पाटील यांनी, शिवाजी विद्यापीठाने यासाठीचा सर्वंकष प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यासाठी लागणाऱ्या सर्व निधीची तरतूद ही राज्य शासनामार्फत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कृषी व अकृषी विद्यापीठांत सुसंवाद वृद्धिंगत व्हावा: कुलगुरू डॉ. सावंत
वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्रात कृषी व अकृषी विद्यापीठे ही विशिष्ट हेतूने निर्माण करण्यात आली आहेत. तथापि, उभय विद्यापीठांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन तो वृद्धिंगत होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने वर्धापनदिन समारंभास प्रथमच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आमंत्रित करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. अकृषी विद्यापीठांमध्ये मूलभूत संशोधन मोठ्या प्रमाणावर चालते, तर कृषी विद्यापीठांत उपयोजित संशोधनावर भर असतो. या पार्श्वभूमीवर, येथील मूलभूत संशोधनाचे उपयोजित संशोधनात व तंत्रज्ञानात रुपांतर करून त्याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी काल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या जानेवारी २०२३मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भातील सामंजस्य करार करण्यासाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांना त्यांनी आमंत्रितही केले. शिवाजी विद्यापीठात आधुनिक मत्स्यालय उभारण्याचे डॉ. शिर्के यांचा मानस आहे. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
विद्यार्थी केंद्री उपक्रमांत विद्यापीठ आघाडीवर: कुलगुरू डॉ. शिर्के
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यार्थी केंद्री उपक्रम राबविण्यामध्ये शिवाजी विद्यापीठ सदैव आघाडीवर असून नवनवीन शैक्षणिक व संशोधकीय उपक्रमांचे लाभ विद्यार्थ्यांना करवून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. नवे शैक्षणिक धोरण राबविण्याच्या दिशेनेही विद्यापीठाने बरीचशी आघाडी घेतली असून अभ्यासक्रमांत बहुद्वार प्रवेश व बहुद्वार निर्गमनाची सुविधाही विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यापीठाने आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम सुविधा धोरण स्वीकारले असून त्याचे लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. अर्थशास्त्रात एकात्मिक बी.एस्सी.-एम.एस्सी. अभ्यासक्रम, विद्यापीठ स्तरावर बीसीए-एमसीए अभ्यासक्रमाची सुरवात ही त्याची काही उदाहरणे आहेत. सध्या विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग स्वायत्त झाला असून नजीकच्या काळात विज्ञानाकडीलही काही अधिविभाग स्वायत्त होतील. एकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये साठ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणीही लवकरच पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, संशोधनवृत्ती, पोस्ट-डॉक शिष्यवृत्ती आदी प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. मातृभाषेतून शिक्षणाचा भाग म्हणून कायदा विषयाच्या परीक्षा इंग्रजीसह मराठीतून घेण्यास सुरवात केली आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मंत्री श्री. पाटील यांनी मत्स्यालयासाठी निधी देण्याच्या घोषणेचे स्वागत केले. त्याचप्रमाणे विद्यापीठ कॅम्पसवर विद्यार्थिनींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक झाली असून वसतिगृहे अतिरिक्त असूनही पुरेशी पडत नसल्याची बाब निदर्शनास आणली. विद्यार्थिनी वसतिगृहासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी या प्रसंगी केली. कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा वेधही थोडक्यात घेतला.
या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गतपुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
इस्लामपूरच्या मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयास पुरस्कार
त्याचबरोबर ‘नॅक’चे ‘अ+’ मानांकन मिळविणाऱ्या देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर व आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे आणि ‘अ’ मानांकन मिळविणाऱ्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरूण-इस्लामपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी,कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी, मालती वसंतदादा पाटील कन्या कॉलेज, उरूण-इस्लामपूर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, सातारा या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार नॅनोसायन्स व ग्रंथालयशास्त्र अधिविभागांस!
शिवाजी विद्यापीठाने सन २०१९पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांना देण्यात आला.
‘विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे…’ विद्यापीठ गीताचे टाळ्यांच्या गजरात स्वागत
‘कीर्ती तुझी मंगलमय स्मरणी असू दे, ज्ञान हेच अमृत हे ब्रीद असू दे… विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे…’ या विद्यापीठ गीताचे मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सर्व उपस्थितांना टाळ्यांच्या गजरात गीताचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी या गीताप्रती आदरभाव व्यक्त करताना उभे राहून सामूहिक गायन केले.
वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: डॉ. प्रकाश शंकर कांबळे, अर्थशास्त्र अधिविभाग
विद्यापीठातील गुणवंत सेवक:
१. डॉ. उत्तम कोंडिबा सकट, सहाय्यक कुलसचिव, लेखा विभाग
२. धैर्यशील विजयसिंह यादव, वरिष्ठ सहायक, पगापत्रके विभाग
३. सदानंद विठ्ठल लोखंडे, वाहनचालक, वाहन विभाग
४. बाळू गोविंद नलवडे, हावलदार, संलग्नता टी-२ विभाग
संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:
१. डॉ. प्रवीण नारायण चौगुले, डी.आर. माने महाविद्यालय, कागल
संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक:
१. डॉ. शिवाजी मुरलीधर भोसले, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कराड
महाविद्यालयीन गुणवंत सेवक:
१. चेतन कृष्णात पाटोळे, प्रयोगशाळा सहाय्यक, न्यू कॉलेज, कोल्हापूर
२. दत्तात्रय जगन्नाथ खराडे, ग्रंथालय परिचर, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (जि. सातारा)
बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. आण्णा काका पाटील, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका: डॉ. उषा बाहुबली पाटील, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव निधीपैकी ५.३५ कोटी रुपयांचा निधी कालच शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान व राष्ट्रगीत सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील, सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले आवर्जून उपस्थित होते.
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































































