Last Updated on 17 Oct 2023 5:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत
अँटी-मायक्रोबियल प्रतिकार शक्ती देखील जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण धोका
नवी दिल्ली । प्राणीजन्य रोग हा चिंतेचा विषय आहे,याचा परिणाम मानवांच्या तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर होतो,गेल्या तीन दशकांमध्ये लोकांना प्रभावित केलेल्या नव्याने निर्माण झालेल्या संसर्गजन्य रोगांपैकी 75 टक्के रोग हे प्राणीजन्य स्वरूपाचे आहेत.प्राणीजन्य रोग ओळखण्याचे मर्यादित ज्ञान आणि कौशल्य आणि सर्व स्तरांवरील मर्यादित निदान सुविधांमुळे प्राणीजन्य रोगजंतूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांकडे दुर्लक्ष झाले आहे,असे केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी सांगितले.
‘मानव-प्राणी संपर्कामुळे उद्भवणाऱ्या प्राणीजन्य रोगांचे निरीक्षण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद आणि ‘सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती योजनेच्या समर्थनासंबंधी राष्ट्रीय परिषदेत मुख्य भाषण देताना ते हितसंबंधितांना संबोधित करत होते.वन हेल्थ केंद्र आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी) वतीने ही परिषद नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती.
भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव रोगांच्या प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने प्राणीजन्य रोगाच्या विशिष्ट संवाहक आणि रचनेची अधिक चांगली समज असणे महत्वाचे आहे,असे प्रतिपादन सुधांश पंत यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.अलीकडील कोविड-19 महामारीचा प्रभाव अधोरेखित करताना ते म्हणाले की,“मानव आणि प्राणी या दोघांच्याही दृष्टीकोनातून रोगांचे निराकरण करणे महत्वाचे आहे कारण बहुतेक उदयोन्मुख संसर्गजन्य रोग हे मानव-प्राणी संपर्क आणि त्यांचे सामायिक वातावरण बदलण्याचे परिणाम आहेत.या परस्परसंबंधांनी एक आरोग्य दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली असून ती प्रत्येक क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या पूरक उपाययोजनांचा आणि सामर्थ्यांचा लाभ घेण्यास आणि एकात्मिक, बळकट आणि लवचीक प्रतिसाद प्रणाली तयार करण्यात सहाय्य करते,असे ते म्हणाले.
प्राणीजन्य रोगांच्या उदया व्यतिरिक्त,अँटी-मायक्रोबियल प्रतिकार शक्ती (एएमआर ) देखील जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण धोका म्हणून उदयास आली आहे,असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी नमूद केले.
या नवीन आणि उदयोन्मुख आरोग्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर,केंद्रीय आरोग्य सचिवांनी ‘एक आरोग्य’ दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले,भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या‘एक पृथ्वी,एक कुटुंब,एक भविष्य’ या संकल्पनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला होता.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला त्याच्या आयडीएसपी, एएमआर,हवामान बदल आणि एक आरोग्य केंद्र या विविध तांत्रिक विभागांच्या माध्यमातून मानव, प्राणी आणि पर्यावरणाला धोका पोहचवणाऱ्या प्राणीजन्य आजारांमुळे उद्भवू शकणाऱ्या साथीच्या रोगाच्या तयारीशी संबंधित उपक्रम हाती घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे,असे त्यांनी भारत सरकारने हाती घेतलेल्या विविध “वन हेल्थ ” प्रयत्नांवर प्रकाश टाकताना सांगितले.
सर्पदंशामुळे होणारी विषबाधा ही जीवघेणी स्थिती आहे आणि भारतामध्ये याचे प्रमाण अधिक असल्याने हा सार्वजनिक आरोग्य चिंतेचा मुद्दा आहे,असे सुधांश पंत यांनी अधोरेखित केले.












































































