Last Updated on 25 Oct 2024 10:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १२५९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १२५० तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
१०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.












































































