Last Updated on 21 Mar 2023 10:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य शासनाचे ध्येय आहे.त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत 30 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच आधारजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास नवीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयंत आसगावकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले की,शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.याची प्रक्रिया एप्रिलअखेर पूर्ण करण्यात येईल.या पदभरतीमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये कला विषयाच्या पदांचा समावेश नाही.सदर शिक्षक हे समग्र मधून देण्याची कायद्यात तरतूद आहे.त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने ज्या एजन्सी नेमल्या आहेत त्या माध्यमातून कला शिक्षक घेतले जातील असेही श्री केसरकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना क्रीडा विषयांचे शिक्षण देण्यासाठी सेवा निवृत्त सैनिकांना शिक्षण खात्यात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात राज्य शासनाने घेतला आहे. बीपीएड पदवीधर आणि सेवा निवृत्त सैनिक यांच्या माध्यमातून दर्जेदार शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अरुण लाड यांनी सहभाग घेतला.






































































