Last Updated on 28 May 2022 8:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
साखराळे (ता.वाळवा) येथे साखर कामगार मेळावा
सांगली ।
येत्या काही दिवसात राज्याचे सहकार मंत्री,कामगार मंत्री,कामगार संघटनांचे प्रतिनिधी व संबंधितांशी बैठक घेवून राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेवू,असा विश्वास देशाचे माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांनी साखराळे (ता.वाळवा) येथील साखर कामगार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याने उत्तर प्रदेशला मागे टाकून साखर उत्पादनात देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. राज्यातील साखर कारखानदारी अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे,वाढत आहे,ही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी साखर कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील,कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खा.श्रीनिवास पाटील,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम,आ.मानसिंग नाईक,सुमन ताई पाटील,अरुणअण्णा लाड,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील,महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी शाहीर देवानंद माळी (सांगली) यांचा अतिशय सुरेख पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला.

साखराळे येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या जाहीर मेळाव्यात बोलताना खा.शरदचंद्र पवार.व्यासपीठावर ना.जयंतराव पाटील,ना.हसन मुश्रीफ,ना. बाळासाहेब पाटील,ना.विश्वजित कदम, खा.श्रीनिवास पाटील व मान्यवर. समोर जाहीर मेळाव्यास उपस्थित साखर कामगार.
खा.पवार म्हणाले,पूर्वी खाजगी साखर कारखाने होते. त्यांच्यापासून एक दृष्टी मिळाली आणि प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. राज्यातील सहकारी साखर कारखाना चळवळ वाढविण्यात स्व.वसंतदादा पाटील, स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.राजारामबापू पाटील,तात्यासाहेब कोरे यांच्यासह अनेक धुरीणांनी योगदान केले आहे. सध्या साखर कारखान्यांची संख्या वाढताना गुणात्मक बदल होत आहेत. साखर एके साखरच्या पलिकडे जावून साखर,वीज व इथेनॉल निर्मिती केली जात आहे. एके काळी राज्यात सर्वात मोठा कापड गिरण्यांच्या उद्योग होता. गिरणगाव,लालभागात १२० कापड गिरण्या आणि २ लाख गिरणी कामगार होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागातील संख्या मोठी होती. आज गिरणगावात फक्त एक गिरणी तीही कमी कामगारात सुरू आहे. मात्र साखर उद्योग अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे,वाढतो आहे,ही समाधानकारक बाब आहे. पुणे येथील वसंतराव इन्स्टिट्यूट मध्ये कामगारांच्या दुसऱ्या पिढीला तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कामगारांना १०-१० महिने पगार मिळत नाही,त्यांनी जगायचे कसे? आकृती बंधपेक्षा नोकर भरती करणाऱ्या संचालक मंडळांच्या बद्दल सहकार खात्याने कडक निर्णय घेण्या ची गरज आहे. साखर कामगार संघटनेच्या दिवंगत नेत्यांनी साखर कामगारांचे हित जोपासताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही हित पाहिले आहे. त्यांची आठवण ठेवायला हवी.
ना.जयंतराव पाटील म्हणाले,खा. पवारसाहेब हे साखर उद्योगातील शेतकरी, कामगार आणि तोडणी मजुरासह सर्व घटकांचे आधार स्तंभ आहेत,हे जगातील पहिले उदाहरण आहे. साखर उद्योगातील कोणताही प्रश्न त्यांच्याकडे गेल्याशिवाय मार्गी लागत नाही. सध्या देशा तील कामगार अस्वस्थ आहे. मात्र कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात कामगारांच्या मधून अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही. भविष्यात कामगार चळवळ अधिक मजबूत करीत कामगार विरोधी घटकांच्या विरोधात तीव्र संघर्ष करायला हवा.
ना.बाळासाहेब पाटील म्हणाले,पगार वाढीच्या चर्चेत अनेक वादाचे प्रसंग आले. खा.पवार साहेबांनी दिलेला निर्णय आपण सर्वांनी मान्य केला. सध्या काही साखर कारखाने करार करीत नाहीत आणि केला तर अंमल बजावणी करीत नाहीत. याबद्दल राज्यातील सहकार विभाग नक्की दक्षता घेईल. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये राज्यातील साखर कामगारांना कुशल प्रशिक्षण देवून कुशल कामगार घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी जाचक अटींचा विचार करून आपण त्या विरोधात उभा राहायला हवे.
ना.मुश्रीफ म्हणाले,सहकार चळवळ पुढे न्यायाची असेल,तर बरं नव्हे खरं बोलावे लागेल. नोकर भरती मुळावर उठली आहे. एखाद्या साखर कारखान्याने पॅटर्नच्या बाहेर जाऊन नोकर भरती केल्यास कामगार संघटनेने विरोध करायला हवा. तसेच सहकार खात्यानेही काही बंधने घालायला हवीत.जे साखर कारखाने चांगले चालले आहेत,त्यांनी महिन्याची महिन्याला पगार द्यायला हवा. कामगार आयुक्त तसा आदेश देतील. मात्र जे साखर कारखाने अडचणीत आहेत,त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू.
ना.कदम म्हणाले, कामगार कायद्यात ज्या काही जाचक अटी आल्या आहेत,त्या राज्य सरकारच्या नाहीत,याचा अभ्यास राज्यातील कामगारांनी करावा. आपले प्रश्न सोडवित आपल्या हिताला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
पी.आर.पाटील म्हणाले, स्व.बापू, ना.जयंतराव पाटील यांनी सातत्याने कामगारांना आपल्या कुटुंबातील घटका प्रमाणे वागणूक दिली आहे. साखर निर्यात बंदी म्हणजे साखर दर पाडण्याचे षड्यंत्र आहे.
अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, खा.पवारसाहेबांनी कामगार व सहकार मंत्र्यांच्या समवेत आमची बैठक घ्यावी. आमचे छोटे-छोटे प्रश्न मार्गी लागतील.
कार्याध्यक्ष राऊ पाटील म्हणाले,राज्या तील अनेक साखर कामगारांचे पगार थकले आहेत,यामध्ये खा.पवारसाहेबांनी लक्ष घालावे.
खा.पवारसाहेब यांचा राज्यातील साखर कामगारांच्या वतीने १२ टक्के पगारवाढ देण्यात योगदान केल्याबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला. तसेच कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनेही सर्वांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी केंद्र सरकारच्या कामगार धोरणांचा निषेध करून राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के पगार देण्यात खा.पवारसाहेबांचे मोलाचे योगदान असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्या साठी आमदार हवा,अशी मागणीही केली. उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.
राजारामबापू सहकारी साखर कारखाना राज्यातील आदर्श साखर कारखाना
एके काळी चांगला साखर कारखाना पाहण्यास आम्ही सांगलीस येत होतो. मात्र तो साखर कारखाना आता सहकारी राहिला नाही. मात्र ती कमतरता जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने भरून काढली आहे. लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे जयंतराव पाटील यांनी वटवृक्ष केला आहे. हा कारखाना राज्यातील साखर कारखान्यांच्या मार्गदर्शनाचे केंद्र बनला आहे.












































































