Last Updated on 01 Apr 2025 7:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एका दृष्टीक्षेपात……………………………………..
✅ आर्थिक वर्षात बँकेने केला रुपये २५४९ कोटी १३ लाखाच्या ठेवींचा टप्पा पार
✅ १७०४ कोटी ३६ लाखाच्या कर्जाचे वाटप
✅ या आर्थिक वर्षात रुपये ४२५३ कोटी ४९ लाखाचा एकूण व्यवसाय
✅ सेवकांना २५ टक्के बोनस तथा सानुग्रह अनुदान देण्याची केली तरतूद
✅ बँकेच्या एकूण ५० शाखामध्ये ४०१ कर्मचारी कार्यरत
✅ प्रतिसेवक व्यवसाय १० कोटी ६० लाख इतका
✅ सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा मानस
सांगली । देशातील नागरी सहकारी बँकात २३ व्या क्रमांकावर वाटचाल करीत असलेल्या पेठ (ता.वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जे वाटप, एकूण व्यवसाय, प्रतिसेवक व्यवसायात वाढ करीत रुपये ५० कोटी ७४ लाखाचा ढोबळ नफा मिळविला आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा आमचा मानस असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर प्रामुख्याने उपस्थित होते. संपलेल्या आर्थिक वर्षाची आर्थिक माहिती १ एप्रिलला जाहीर करण्याची २५ वर्षाची परंपरा अखंड सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रा.शामराव पाटील पुढे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९८१ साली समाजातील विविध घटकांना आर्थिक ताकद देण्यासाठी बँकेची स्थापना केली आहे. सध्या माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आमची बँक संपूर्ण देशात यशस्वी वाटचाल करीत आहे. व्यावसायिक व्यवस्थापन,आर्थिक शिस्त,काटकसर व पारदर्शी कारभार ही आमची बलस्थाने आहेत. संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने रुपये २५४९ कोटी १३ लाखाच्या ठेवींचा टप्पा पार केला असून १७०४ कोटी ३६ लाखाच्या कर्जाचे वाटप केलेले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात रुपये ४२५३ कोटी ४९ लाखाचा एकूण व्यवसाय केलेला आहे. बँकेच्या एकूण ५० शाखामध्ये ४०१ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रतिसेवक व्यवसाय १० कोटी ६० लाख इतका आहे. गेल्या १३-१४ वर्षापासून बँकेने शून्य टक्के एनपीए राखण्यात निश्चित यश प्राप्त केलेले आहे. बँकेचा भांडवल पर्याप्तता निधी (सी आरएआर ) १४.७५ टक्के इतका आहे. बँकेने सेवकांना २५ टक्के बोनस तथा सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
प्रा.पाटील म्हणाले, अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर सायबर क्राईमही वाढत आहे. त्यामुळे आम्ही टीसीएस या कंपनीचे अद्यावत तंत्रज्ञान घेतले आहे. हे थोडेसे खर्चिक आहे, मात्र पूर्ण सुरक्षित आहे. मोठया कर्जापेक्षा छोटी-छोटी कर्जे देण्यास आमचे प्राधान्य राहील. बँकेत सन २३-२४ मध्ये ८८ टक्के,तर २४-२५ मध्ये ९२.५० टक्के डिजिटल व्यवहार झाले. बँकेच्या यशस्वी वाटचालीत कर्मचाऱ्यां चे योगदान मोलाचे आहे. आमचे कर्मचारी ग्राहकांना प्रामाणिक व चांगली सेवा देत आहेत.
याप्रसंगी संचालक धनाजी पाटील, माणिक पाटील, डॉ.प्रकाश पाटील, संजय पाटील,अनिल गायकवाड, आर.एस. जाखले, अँड.संग्राम पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, आनंदराव लकेसर, जयकर गावडे, संभाजी पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील,अशोक पाटील, राजेश पाटील, शहाजी माळी, सौ.सुस्मिता जाधव, सौ.कमल पाटील, सीए सुनिल वैद्य, सीए उमाकांत कापसे, डॉ.सचिन पाटील, तसेच उपमुख्य व्यवस्थापकीय अधिकारी आर.ए.पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
देशात २३ वा क्रमांक आणि आपट्याचे पान
संपूर्ण देशात १४७४ नागरी सहकारी बँका असून रिझर्व्ह बँकेने मध्यंतरी देशातील सर्वोच्च ५० बँकांची यादी जाहीर केली. यामध्ये आपल्या बँकेचा २३ वा क्रमांक आहे. अलिकडे बँकेने माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते आपट्याच्या पानाचा लोगो अनावरण केले. आपट्याचे पान हे ऐश्वर्य व प्रगतीचे प्रतीक असल्याचे प्रा.पाटील यांनी सांगितले.
स्व.बापूंचा जपान प्रवास आणि बँकेचे चोख व्यवस्थापन
१९८१ साली बँकेची स्थापना केली, त्याचवेळी बापूंनी जपानचा अभ्यास दौरा केला होता. त्यांनी या दौऱ्यावर पुस्तक ही लिहिले आहे. बापूंनी त्यावेळी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर,चोख व्यवस्थापन व पारदर्शी कारभार सल्ला बँकेच्या संचालक मंडळास दिला होता. आजही आम्ही स्व.बापूंच्या आदर्शवर वाटचाल करीत असल्याचे प्रा.पाटील यांनी सांगितले.










































































