Last Updated on 08 May 2023 7:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन
पुणे | महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडतीची मुदत 15 मेपर्यंत असल्याचे तसेच 15 मे नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश आणि माहिती अज्ञातामार्फत विविध सामाज माध्यमांवर पसरविण्यात येत आहे.
महाडीबीटी पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश आणि माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे, असे कृषि विभागाने कळवले आहे.
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी अर्ज करावेत, असेही आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.












































































