Last Updated on 26 Sep 2022 8:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | ग्रामीण विकास मंत्रालयाने “जलदूत अॅप” विकसित केले आहे ज्याचा वापर गावातील निवडक विहिरींची पाणी पातळी मोजण्यासाठी देशभरात केला जाईल. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री, गिरीराज सिंह उद्या नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात “जलदूत अॅप” चे उद्घाटन करतील.
जलदूत अॅप हे ग्राम रोजगार सहाय्यकाला (जीआरएस) निवडक विहिरींची पाणी पातळी वर्षातून दोनदा (मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यानंतर) मोजण्यासाठी सक्षम करेल. प्रत्येक गावात, मोजमापाच्या ठिकाणांची पुरेशी संख्या (2-3) निवडणे आवश्यक आहे. हे त्या गावातील भूजल पातळीचे निदर्शक असतील.
हे अॅप पंचायतींना ठोस आकडेवारीसह सुविधा देईल, ज्याचा उपयोग कामांच्या चांगल्या नियोजनासाठी केला जाऊ शकतो. भूजल आकडेवारीचा डेटा हा ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) आणि महात्मा गांधी नरेगा नियोजन सरावाचा भाग म्हणून वापरला जाऊ शकतो. तसेच, विविध प्रकारच्या संशोधनासाठी आणि इतर हेतूंसाठी देखील हा डेटा वापरला जाऊ शकतो.
पाणलोट विकास, वनीकरण, जलसंधारण विकास आणि नूतनीकरण, वर्षा जलसंचयन इत्यादीद्वारे ग्रामीण आणि शहरी भागात जल व्यवस्थापन सुधारण्यासाठी देशाने अनेक पावले उचलली आहेत. तथापि, भूजलाचा वापर, तसेच भूपृष्ठावरील जलस्रोतांचा वापर देशाच्या बर्याच भागांमध्ये चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, परिणामी पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाल्याने शेतकऱ्यांसह समाजाला त्रास होत आहे.
त्यामुळे देशभरातील पाण्याच्या पातळीचे मोजमाप आणि निरीक्षण करणे आवश्यक झाले आहे.












































































