Last Updated on 17 Sep 2023 8:27 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर | ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केले. आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, बबनराव तायवाडे, सुधाकरराव कोहळे,परिणय फुके, आशीष देशमुख व इतर नेते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आज संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांची सुद्धा भेट घेतली.ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येणार नाहीत किंवा ते कमी होऊ देणार नाही. ओबीसींवर अन्याय होणार नाही, ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे.मराठा समाजाची जी अपेक्षा आहे,ती मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिले होते,ते परत मिळावे,ही आहे. यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली असून,न्या. भोसले समितीने सूचविलेल्या उपाययोजना सुद्धा हाती घेण्यात आल्या आहेत.
ओबीसी समाजासाठी 26 विविध जीआर आम्ही काढले होते.त्यातील अनेक निर्णय अंमलात आले आणि काहींवर अंमलबजावणी होते आहे.प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहाबाबत परवाच बैठक झाली.काही ठिकाणी जागा किरायाने घेण्याची सुद्धा तयारी केली आहे.शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत.आता तर ओबीसींसाठी 10 लाख घरांची मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.तुमच्या ज्या अन्य मागण्या आहेत,त्याबाबत येत्या आठवडाभरात मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि अन्य संघटनांची एकत्रित बैठक घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहे,ती ओबीसींच्या हिताची योजना आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कंत्राटी भरती ही तात्पुरतीच!
कंत्राटी भरतीसंदर्भात जाणिवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत. एक बाब स्पष्टपणे सांगतो की, नियमित आस्थापनेवरील कोणत्याही जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार नाहीत.75 हजार पदभरतीचा निर्णय आम्ही घेतला आणि कार्यवाही सुरु केली.आता ती भरती दीड लाखांच्या घरात जात आहे.ती कायमस्वरुपी भरती प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावी लागते, कारण काम थांबू शकत नाही.
कायमस्वरुपी भरतीला वर्ष-दीड वर्ष लागतात.राज्यात ही पद्धत फार पूर्वीपासून आहे.कंत्राटी भरतीचा हा निर्णय सुद्धा गेल्या सरकारनेच घेतलेला आहे,त्यात आम्ही केवळ कामगारांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतील,अशी सुधारणा केली.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.ही केवळ तात्पुरती व्यवस्था आहे. युवकांवर कोणताही अन्याय होणार नाही,असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.









































































