Last Updated on 24 Aug 2025 7:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर । प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण अशा महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले आहे. लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील अशी १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ३ हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत २४ कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या गावाला देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनविले आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सातनवरीच्या सरपंच वैशाली चौधरी, आदी उपस्थित होते.
अशी आहे स्मार्ट व्हिलेज संकल्पना
तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातनवरी गावात सुरू झालेला देशातील स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ हे एक क्रांतीकारक पाऊल आहे. गावांना सक्षम करण्याच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील गावागावांमध्ये भारतनेट प्रकल्प राबविला गेला. याची पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाली व दुसऱ्या टप्प्याची सुरूवातही झाली. याच धर्तीवर महाराष्ट्रात महानेट हा प्रकल्प राबविण्यात आला. आता याच प्रवासात भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत गावांमध्ये आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा एकूण १८ सेवा कमी वेळेत उपलब्ध करून देत सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातनवरी, नागपूर येथे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, एंटरप्रायजेस(VoICE) कंपनी समवेत ‘स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी’ घडविण्यात योगदान देणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रशस्तीपत्र प्रदान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींचा उपयोग करून माती परिक्षण, फवारणी, खते आदींचे योग्य नियोजन करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसीन आदींचा उपयोग होऊन गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होणार आहे. गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होऊन वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल














































































