Last Updated on 30 Mar 2025 6:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गावच्या विकासासाठी एक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव | गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. गावचा विकास हा लोकांच्या मनात ठसला पाहिजे . त्यासाठी सरपंचासह सर्वांनी पुढाकार घेऊन मेहनत घेणे गरजेचे असते. बचत गटाच्या महिला अधिकाधिक सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी जिल्हाभर बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सुसज्ज अशा मॉलचे निर्मिती करण्यात येत आहे. गावाचा विकास बॅनरवर नाही, तर जमिनीवर दिसला पाहिजे.” असं सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केले.
ते जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजना’ च्या विशेष जन सुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुल धारकांना जागा वाटप सोहळ्यात बोलत होते. दिनांक 29 मार्च रोजी सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते.
यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. राजू मामा भोळे, आ. अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी बांधकामांचे व घरकुल धारकांना जागा वाटप आदेश वितरण
या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हाभरातील ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामसेवक यांना 45 ग्रामपंचायत भवन , 130 स्मशानभूमी बांधकाम, स्मशानभूमी पोहोच रस्ते अश्या विविध विकास कामांच्या योजनांच्या आदेश वाटप करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 कंत्राटी ग्रामसेवकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा भारातून सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या खुमासदार व मिश्कील शैलीत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याचा अहवाल क्रमांक राहिला आहे. यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेने मेहनत घेऊन कामे मार्गी लावली आहे. गेल्या कालावधीत जळगाव जिल्ह्याने शाळांना संरक्षक भिंत ही अभिनव योजना राबवली या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यातील जवळपास 500 शाळांमध्ये आपण संरक्षक भिंत उभारून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करून देऊ शकलो आहोत. पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या ग्रामपंचायतीची इमारत नसेल अशा ग्रामपंचायतींना सुसज्ज अशी 45 इमारती आपण मंजूर केल्या आहेत. यासाठी उत्कृष्ट इमारती उभ्या राहाव्यात म्हणून ग्रामपंचायतिना बक्षीसाची योजना देखील आपण केली आहे. या गावात ग्रामपंचायतीची इमारत सुंदर असेल ते गाव विकसित असते अशी त्याची ओळख निर्माण होते. गाव सुंदर करायचे असेल तर त्यासाठी सरपंचांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावात देखील ‘जो काम करेगा वही गाव पे राज करेगा’ अशीच भूमिका येणाऱ्या काळात ग्रामस्थांनी घेणे गरजेचे आहे.. आमदार होणे सोपे असते मात्र कमी लोकांमधून निवडून येऊन सरपंच होणे कठीण असतं त्यामुळे निवडून आलेल्या सर्व सरपंचांवर देखील मोठी जबाबदारी आहे. असेही ते यावेळी म्हणाले.:ग्रा मपंचायतीच्या अनेक किस्से मिश्कीलपणे त्यांनी मांडून उपस्थितांचे मन जिंकली.
सरपंचानी मनात आणले तर गावाचे चित्र बदलू शकते.- मंत्री गिरीश महाजन
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ग्राम पातळीवर सरपंच आणि सदस्यांनी मनात आणले तर गावाचे चित्र बदलू शकते. त्यासाठी सरपंचांनी इतर कामात गुंतून न राहता गावच्या विकासाचा विचार केला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पावले उचलत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. या पुढच्या काळात एकही कुटुंब स्वतःच्या घराशिवाय राहणार नाही या दृष्टीने सरपंचांनी पुढाकार घेऊन घरकुल योजना अधिक व्यापक केली पाहिजे. ग्रामसेवक व सरपंचांमध्ये समन्वय समन्वय ठेवून स्वच्छ गाव – सुंदर गाव करण्यासाठी सरपंचानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.














































































