Last Updated on 31 Oct 2021 8:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड ।
नेहमी दुकान फोडले घरफोडी, वाहनचोरी अशा अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आपण ऐकतो मात्र बीड जिल्ह्यातील परळी शहरांमध्ये चक्क 124 गाढवांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
या गाढवांची किंमत 20 लाखांच्या घरात असून याबद्दल तक्रार शहर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आली आहे. परळीमध्ये गाढवं चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जवळपास 34 गाढवांच्या मालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली आहे. गाढव हा उदरनिर्वाहाचं साधन असल्या कारणाने याचा त्वरित तपास लावून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी या गाढवाच्या मालकांच्या वतीने करण्यात आली आहे.
25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या सुमारास आमचे 124 गाढवं चोरीस गेली आहेत. मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि नाथ चित्र मंदिर परिसरातून ही चोरी झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.
चोरीस गेलेल्या 124 गाढवांची बाजारभाव किंमत सरासरी प्रत्येकी 15 हजार सांगण्यात येत असून त्याची अंदाजे एकूण किंमत 20 लाखांच्या घरात आहे. या गाढवांवरच आमचा आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असून आमच्यावर भविष्यात उपासमारीची वेळ येऊ शकते तेव्हा चोरीचा योग्य दिशेने तपास लावून आम्हाला न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी केली आहे.










































































