Last Updated on 15 Apr 2025 4:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कासेगाव शिक्षण संस्थेच्या कासेगाव (ता.वाळवा) येथील आझाद विद्यालयात १९८५-८६ साली इयत्ता १० वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल ३९ वर्षांनी एकत्र येत एकमेकांची ख्याली- खुशाली विचारत गप्पा-गाणी आणि विविध खेळ खेळत धमाल केली. शालेय जीवनातील आठवणींची शिदोरी ही पुढच्या प्रवासाला नवी ऊर्जा देणारी आहे,असे सूर आळवत पुन्हा-पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेत सर्व मित्रांनी जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. कासेगाव शिक्षण संस्थेच्या कार्य कारिणीचे सदस्य,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाषराव आडके,आझाद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्वागत करून आपण आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. भविष्यात शाळा व आपला ऋणानुबंध अधिक वाढवित जाऊ, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.
युवा उद्योजक संजय देशमुख,मनिष बर्डे, अशोक माने,प्रा.दिलीप देशमुख,विधेस पाटील,राष्ट्रीय कबड्डीपटू ज्ञानदेव पाटील, शांताराम महाडिक,सुभाष माने,विकास पाटील,जालिंदर पाटील (शेणे),पी.वाय. पाटील (नेर्ले) यांच्या ४-६ महिन्याच्या अथक प्रयत्नातून एकदाची १९८६ च्या बॅचच्या ‘स्नेह मेळाव्या’चा दिवस उजाडला.. कोण-कोण आले असेल? तो-ती भेटेल का? तो-ती कशी दिसत असेल? असे एकना अनेक प्रश्नांचे काहूर डोक्यात घेवूनच विद्यार्थी-विद्यार्थिनी कासेगावच्या आझाद विद्यालयात पोचले..वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी दोन्ही आजी-माजी मुख्याध्यापकांचा आदर,सन्मान करण्यात आला. यानंतर कानात वारे शिरलेल्या वासराप्रमाणे सगळे विद्यार्थी- विद्यार्थिनी शाळेत शिरले आणि हा आपला दहावीचा वर्ग,ही आपली तुकडी,या वर्गात अमका-अमका किस्सा घडला होता,तुला आठवितो का? अशा अनेक आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वत्र हुदाडले. यानंतर स्वारी कराड येथील हॉटेल व्हीट्स (सत्यजित) कडे कूच झाली. येथे दिवंगत २३ सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
येथे अतिशय सुंदर स्वागत,प्रसिध्द गायक फारूक शेख यांच्या बहारदार गाण्यांची मैफिल आणि नाश्ता-जेवणाचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. प्रथम सर्वांनी एकमेकांची ओळखी करून घेतली. यावेळी प्रा.दिलीप देशमुख,सुभाष माने,बाळासो सन्मुख,तसेच संजय देशमुख-मनिष बर्डे यांच्या गाण्यांनी धमाल केली. मध्ये-मध्ये हलके-फुलके विनोद आणि गप्पांनी मेळाव्याची रंगत वाढतच गेली. शेवटी एकदा काहींनी सैराटवर ठेका धरत धमाल केली. मेळाव्याचा समारोप करताना फोन कर,भेटत राहू,काळजी घे असे आस्थेवाईक सल्ले देत जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.
माजी जि.प.सदस्या सौ.संगिता संभाजी पाटील (नेर्ले),राजारामबापू साखर कारखान्या चे प्रसिध्दी अधिकारी विश्वनाथ पाटसुते,प्रा. सुजाता माने,शैलजा कोपार्डे,शांता निकम, प्रा.प्रविण भाकरे,उमा वीर, जयवंत पाटील, सलीम जमादार,छाया माने,अंजली कांबळे, राधिका औंधकर,वंदना औंधकर, दत्तात्रय वाघमोडे,विश्वास माने,रमेश धोत्रे,बबन जाधव,अधिक पाटील,दादासो पाटील, धनाजी पाटील,जगन्नाथ तोडकर,उत्तम गावडे, राजेंद्र गावडे,मानसिंग पाटील यांच्या साधारण ७०- ७५ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या स्नेह मेळाव्यात सहभागी होत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एका अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार झाले.










































































