Last Updated on 29 Jan 2024 9:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । किश्तवार जिल्ह्यातील द्राबशल्ला येथे 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता चिनाब नदीला बोगद्यातून वळवून जम्मू आणि काश्मीरमधील 850 मेगावॅटच्या रटल जलविद्युत प्रकल्पाने एक मोठा टप्पा गाठला आहे.नदीचा प्रवाह वळवल्यामुळे उत्खनन आणि धरणाचे बांधकाम सुरू करण्यासाठी नदीच्या पात्रातील धरण क्षेत्र वेगळे करणे शक्य होईल. यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाला गती येईल आणि संभाव्य विलंब कमी झाल्यामुळे मे 2026 च्या नियोजित कार्यान्वित तारखेची पूर्तता करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न फलद्रुप होतील.
नदी प्रवाह वळवण्याच्या या समारंभाचे उद्घाटन नॅशनल हाइड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशनचे (एन एच पी सी) मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर.के. विश्नोई यांच्या हस्ते आणि जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव एच. राजेश प्रसाद;आर एच पी सी एल चे व्यवस्थापकीय संचालक आय. डी. दयाल,जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) चे संचालक पंकज मंगोत्रा,एन एच पी सीचे संचालक आर एच पी सी एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.के. नौरियाल आणि एन एच पी सी चे आणि जम्मू काश्मीर सरकारचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.
रटल जलविद्युत प्रकल्प हा रटल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (RHPCL) द्वारे कार्यान्वित केला जात असून तो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) यांच्यात अनुक्रमे 51 टक्के आणि 49 टक्के भागीदारीसह स्थापन केला जात आहे.जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर 850 मेगावॅटची स्थापित क्षमता असलेला रटल जलविद्युत प्रकल्प आहे.भारत सरकारच्या एकूण 5281.94 कोटी रुपये गुंतवणूकीच्या या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने जानेवारी 2021 मध्ये मंजुरी दिली.









































































