Last Updated on 15 Nov 2021 11:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
जहाल नक्षली तेलतुंबडेची अभेद्य अत्याधुनिक सुरक्षा तोडण्यात गडचिरोली पोलिसांना यश; पालकमंत्री यांचेकडून पोलीस जवानांचे अभिनंदन
पोलीस विभागाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
गडचिरोली |
गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल असे ते यावेळी म्हणाले.
शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षल मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करणेकरीता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी-60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी-60 जवानां सह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही अभिनंदन केले. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ज्या अडचणी असतील ते मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करुन सोडविले जाईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसलेला आहे. तसेच या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत त्यांनाही जबर हादरा बसला असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी आपल्या संबोधनादरम्यान दिली. यावेळी पोलिसांच्या कडून असलेल्या त्यांच्या मागण्या मी सोबत घेऊन जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काळात जलद गतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नुकत्याच झालेल्या नक्षली चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्र पुरवठा मी पाहिला असून अतिशय मोठ्या प्रमाणात नक्षली तेलतुंबडे याची सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा त्याला मारण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले हे कौतुकास्पद आहे. यामुळे महाराष्ट्रासह इतर नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींनी धडा शिकवण्यात आपल्या राज्याला यश आल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले व अभिनंदनही केले.

शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षल मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करणेकरीता व त्याबाबत माहिती देण्याकरीता आज पोलीस विभागामार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सी-60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी-60 जवानांसह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही अभिनंदन केले.
यावेळी ते म्हणाले, यापूर्वीही पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात नक्षल्यांना रोखण्यात पोलिस विभागाला यश आले असून या विभागाकडून राज्यात शांतता निर्माण करण्यामध्ये पोलीसांची मोठी भूमिका आहे. पोलीसांनी केलेलं नियोजन तसेच उपाय योजनांमुळेच जिल्ह्यात शांतता निर्माण होण्यास मदत होत आहे. या भेटीत त्यांनी यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींची भेट घेतली व त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारून अनुकंपा मधील भरती तसेच त्यांच्या इतर मागण्या मान्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन या मागण्या शासन दरबारी घेऊन त्या मान्य होण्याकरीता आपण प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांना दिले.
यावेळी मंचावर अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान), नागपूर छेरिंग दोरजे, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे उपस्थित होते.














































































