Last Updated on 07 Jan 2022 11:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती : कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी प्रयत्न करा
सांगली ।
कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याला आपल्याला तोंड द्यावे लागेल, त्याला पर्याय नाही. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय आजच जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहिम सुरू आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून पुढील काळात रूग्णालयातील बेड्स कमी पडू नयेत असा आपला प्रयत्न असला पाहिजे, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कोरोनाचा संसर्ग उच्चस्तराला पोहोचला की तो हळूहळू कमी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कोरोना संसर्ग फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढत जाईल व मार्च महिन्यामध्ये तो ओसरेल. राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे थोडीशी भिती लोकांच्यामध्ये आहे. तरी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप यासारखे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून त्वरीत कोविड चाचणी करून घ्यावी. त्याचबरोबर ज्यांनी अद्यापही कोविड लस घेतली नाही, ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे अशांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही केले.












































































