Last Updated on 24 Aug 2022 10:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.












































































