साधारणपणे हिंदू कुटुंबात वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा पूर्ण हक्क मानला जातो. परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही मुलाइतकाच अधिकार आहे. सरकारने हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ मध्ये २००५ मध्ये दुरुस्ती करुन मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत समान हिश्श्याचा कायदेशीर अधिकार दिला आहे. या कायद्यात दुरुस्ती केल्याने मुलीही वडिलोपार्जित संपत्तीचे हक्कदार आहेत. वडील, भाऊ किंवा इतर नातेवाईक हे देण्यास मनाई करु शकत नाहीत.
हिंदू कायद्यात संपत्ती दोन श्रेणीत विभागण्यात आली आहे. वडिलोपार्जित आणि स्वतः कमावलेली संपत्ती. वडिलोपार्जित संपत्ती अंतर्गत चार पिढी आधीपासून मिळालेली संपत्ती येते. म्हणजे ज्याची वाटणी झालेली नाही. अशाप्रकारच्या संपत्तीवर मुलींना जन्मसिद्ध अधिकार आहे. ती संपत्तीत हिश्श्याची मागणी करु शकते. वर्ष २००५ पूर्वी अशा प्रकारच्या संपत्तीमध्ये फक्त मुलाला अधिकार मिळत होता. पण कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर आता मुलींना समान अधिकार मिळत आहे. अशा प्रकारच्या संपत्तीमध्ये हिस्सा देण्यापासून वडिलांनाही रोखता येणार नाही.
वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?
संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित.
कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कुणाकुणाचा वाटा असतो?
वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो. जर कुणाच्या कुटुंबात तीन मुलं असतील तर पहिली वाटणी तीन मुलांमध्ये होईल. आणि तिसऱ्या पिढीच्या मुलांना (त्या व्यक्तीची नातवंडे) ती संपत्ती आपल्या वडिलांच्या हिश्शातून मिळेल.तिन्ही मुलांना आपल्या वारसाहक्काप्रमाणे एक तृतियांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल.मुस्लीम समाजात ही संपत्तीच्या वाटणीची पद्धत वेगळी आहे. जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही.
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे काय नियम आहेत?
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम कडक आहेत, कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात. त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात.
वाटणी झाली नसेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती ती स्वतःच्या मर्जीने विकू शकत नाही.वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणे आवश्यक आहे.
दुसरी पत्नी असेल तर…?
हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते. जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं.
अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्या व्यक्तीला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो.
वडिलोपार्जित संपत्ती नसेल तर त्यावर कुणाचा हक्क?
जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजे ती तुम्हीच कमावलेली असेल, तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची, याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे. तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता.
जर मृत्युपत्र नसेल तर…
वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगळता, जी तुम्ही कमवलेली आहे, त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. जर त्या व्यक्तीचे आई-वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजिविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो.
“जर माता-पितांना हिस्सा नको असेल तर त्यांची जबाबदारी उचलून कोणताही वारसदार ती संपत्ती घेऊ शकतो. दिवाणी कायद्याच्या कलम 125मध्ये देखभालीचा उल्लेख आहे. यानुसार त्या व्यक्तीवर अवलंबून असलेली पत्नी, आईवडील आणि मुलं त्या व्यक्तीच्या संपत्तीवर आपल्या उपजीविकेसाठी कायदेशीररीत्या दावा करू शकतात.