एकरकमी एफआरपी अधिक ६०० रुपयांची मागणी
सांगली ।
उसाला एकरकमी एफआरपी अधिक ६०० रुपये मिळाले पाहिजेत,या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या रविवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत दिली.
येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रविवारी सकाळी शेतकरी संघर्ष यात्रेला सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.युवराज जाधव,अॅड.युनूस मुल्ला जयसिंगराव उथळे उपस्थित होते.
ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत उसाला योग्य दर मिळालेला नाही. आज बाजारात साखरेचा दर ३० ते ३६ रुपये प्रतिकिलो झाला आहे.महागाई प्रचंड वाढली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना वाईट वागणूक मिळत आहे. त्यांची सर्व बाजूंनी लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष केला तरच त्याला न्याय मिळणार आहे.
रविवारी संघर्ष यात्रा येडेमच्छिंद्र शिरटे, नरसिहपूर, खुबी, कृष्णा कारखाना,रेठरे बुद्रक,गोंदी,शेरे शेणोली,वडगाव हवेली कोडोली कार्वे गोळेश्वर या मार्गे कराड येथील सहकार मंत्र्यांच्या घरावर धडकणार आहे.मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सहकार मंत्र्यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एफआरपीबद्दल आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही.उसाच्या एफआरपीचा कायदा या मंत्र्यांकडून मोडला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. मशिनने ऊस तोडणीसाठी ५ टक्के कपात केली जात आहे. ती रद्द करावी, गेल्या हंगामातील उसाचे ५०० रुपये द्यावेत आदी मागण्या आमच्या आहेत.
मोहनराव खराडे,सत्यजित माने,अशोक सलगर,सुधीर कदम, संजय जाधव,शामराव मगदूम आदी यावेळी उपस्थित होते.