कार्यक्रमात महाडिक समर्थकांची काळे झेंडे दाखवून निदर्शने
सांगली । वाळवा तालुक्यातील पेठ महसूल मंडळ अंतर्गत पेठ येथील श्री महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांनी महसूल, ग्रामसेवक, पाटबंधारे, एमएसईबी, आरोग्य, पुरवठा, बांधकाम विभाग आदी विविध शासकीय यंत्रणांविरोधात असलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांना सादर केल्या. दरम्यान, या कार्यक्रमात महाडिक समर्थकांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.
सदर तक्रारी व अर्जांवर तात्काळ कार्यवाही करावी, असा स्पष्ट आदेश आमदार खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. जनतेच्या प्रश्नांवर जाणूनबुजून दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिले. यापुढील काळात गावोगावी दौरे करून प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
या शिबिरादरम्यान ‘१०० दिवसांचा कृती आराखडा’ उपक्रमांतर्गत तात्काळ वारस नोंदी व पाणंद रस्त्याच्या नोंदी झालेल्या ७/१२ उताऱ्यांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. याचबरोबर कृषी विभागाच्या योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी रधुनाथ पांढरे, तसेच पेठ महसूल मंडलातील सर्व ग्रामसेवक, तलाठी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष अमोल पाटील, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष बजरंग भोसले, लालासो पाटील, नंदकुमार पाटील, अतुल पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती.
आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ…
दरम्यान, या कार्यक्रमात महाडीक समर्थकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने केली. सत्ताधारी भाजप पक्षात असूनही हा उपक्रम घेताना प्रशासनाने आपणाला विचारात न घेता व लोकांच्यापर्यंत याची माहिती न पोहोचवता अचानक मेळावा घेतल्याने महाडिक गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. या निर्शनामुळे कार्यक्रमात काहीकाळ गोंधळ उडाला. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाकडे आ. सत्यजित देशमुख यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनावरुन भाजपमध्येही ताळमेळ नसल्याचे पहायला मिळाले. या आंदोलनामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली.