आता इतर सर्व खर्च कमी करणार : बीसीसीआय
आयपीएलच्या स्थगितीमुळे भारताच्या क्रिकेट मंडळाला जवळपास चार हजार काेटींचा फटका बसणार
नवी दिल्ली : लाॅकडाऊनमुळे स्पाेर्ट्सचे सर्वच इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळही आर्थिक अडचणीत सापडले आहे. मात्र, अशा संकटातही आपण खेळाडूंच्या वेतनात काेणत्याही प्रकारची कपात करणार नाही. यासाठी आम्ही आता इतर सर्व खर्च कमी करणार आहाेत. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी खेळाडूंच्या वेतनातील कपात हा आमच्यासाठी सर्वात शेवटचा पर्याय आहे. मात्र, असे हाेणार नाही, अशी माहिती बीसीसीआयचे काेषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली. आयपीएलच्या स्थगितीमुळे भारताच्या क्रिकेट मंडळाला जवळपास चार हजार काेटींचा फटका बसणार आहे.
काेराेनाच्या संकटामुळे अनेक माेठ्या क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. यातील लाॅकडाऊनमुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंच्या वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय आपल्या इतर स्टाफमधील ८० टक्के कर्मचारीही कमी केले.
परिस्थिती सुधारण्याचा विश्वास : सध्या फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वच क्रिकेट मंडळांना आर्थिक झळ साेसावी लागत आहे. मात्र, अशा संकटाचा खेळाडूंना फटका बसू नये यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहाेत. त्यामुळे खेळाडूंच्या वेतनात कपात करणार नाही. ही परिस्थिती बदलेल, असेही ते म्हणाले. आयपीएल न झाल्याने माेठा आर्थिक फटका बसत आहे. यासाठी आम्ही आता इतर खर्चावर अंकुश ठेवणार आहाेत. लाॅकडाऊनमधील सवलतीनंतर सकारात्मक चित्र निर्माण हाेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात भारतीय संघ फक्त ४ टेस्ट खेळणार :गांगुली आगामी ऑस्ट्रेलिया दाैऱ्यामध्ये भारताचा संघ कसाेटी मालिकेत फक्त चारच सामने खेळणार आहे. याशिवाय ठरल्याप्रमाणे प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळू शकेल, अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीने दिली. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता भारतविरुद्ध कसाेटी मालिका पाच सामन्यांची करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, याला बीसीसीआयने स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. कारण, हा दाैरा माेठा असेल. दाेन आठवडे आधीच संघाला ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे लागेल. कारण, दाेन आठवडे संघाला क्वाॅरंटाइन केले जाणार आहे.