![]()
-
राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांनी मांडला बाजार; गल्लीपासून दिल्लीपर्यंत साखळी
-
राज्यभरात सध्या अनेक संघटना तसेच फाऊंडेशनच्या नावाखाली कार्यरत
-
पुरस्कार घेणार्यांमध्ये शासकीय तसेच निमशासकीय अधिकार्यांचा भरणा
-
फक्त पुरस्कार देण्यासाठीच काही संस्था जन्माला;पैसा कमविण्याशिवाय दुसरे कोणतेही मोजमाप नाही
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत आहे. पुरस्काराच्या माध्यमातून अनेकांनी लाखो रुपयांची माया गोळा केली आहे. कोणतेही सामाजिक कार्य न करता काही संघटना-फाऊंडेशनचे कार्य फक्त पुरस्कार देण्यापुरतेच मर्यादित आहे.
राज्यभरात सध्या अनेक संघटना तसेच फाऊंडेशनच्या नावाखाली कार्यरत असलेल्यांनी समाजातील विविध घटकांना गाठून पुरस्कार देण्याचा सपाटाच लावला आहे. अशा संस्थांना ना सामाजिकतेचा आधार ना समाजमान्यता आहे. पुरस्कार एके पुरस्कार एवढेच मर्यादित स्वरूप प्राप्त केलेल्या काही संस्था पावसाळ्यात उगवणार्या छत्र्यांप्रमाणे कार्यरत असल्याचे दिसत आहे.
वर्षातून एक-दोन वेळा पुरस्कारांची घोषणा करायची, समाजातील काही विभागातील लोकांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा त्यांच्याकडूनच किमान १०-२० हजार रुपये घेवून एखादे स्मृतीचिन्ह आणि जाडजूड कागदावर गौरवाचे काही शब्द लिहून त्यांचा यथोचित गौरव केल्याचा ढोल काही संघटनांकडूून सध्या वाजविला जात आहे. प्राईड,नेशन यासारखे बिरुदावली देत समाजभूषण, पत्रकारभूषण, आदर्श उद्योजक,आदर्श अभियंता, वैद्यकीय भूषण यासारखी गोंडस नावे देवून पुरस्कारप्राप्त व्यक्तींकडून हजारो रुपये उकळण्याचा धंदाच काहींनी मांडला आहे.
अशा एखाद्या संघटना तसेच फाऊंडेशनने पुरस्कार दिल्यानंतर संबंधित पुरस्कारप्राप्त व्यक्तीला अशा पुरस्कार देणार्या दुसर्या काही संघटना त्यांना गाठण्याचा उद्योग करतात.पुरस्कारप्राप्त व्यक्तींना आपल्याला पुरस्कार देण्याचा विचार चालू आहे.तरी आपण आमच्या संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन काही संस्थांकडून केले जाते. त्या व्यक्तीला भावनिक बनवून त्याच्याकडून जाहिरातीसाठी म्हणून मोठी रक्कम वसूल करून त्याच रकमेतील फेटा, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि बुके देवून त्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जातो.
पुरस्कार घेणार्यांमध्ये शासकीय तसेच निमशासकीय अधिकार्यांचा भरणा अधिक आहे.कोणतेही खासगी पुरस्कार शासकीय तसेच निमशासकीय अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी स्वीकारू नयेत असा शासनाचा फतवा असताना सांगली, सातारा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही अधिकारी तसेच कर्मचार्यांनी असे पुरस्कार स्विकारल्याची आजपर्यंत अनेक उदाहरणे समोर आहेत.
समाजातील संबंधित व्यक्ती तसेच संस्था आणि अधिकारी व कर्मचारी खरोखरच पुरस्काराला लायक आहेत किंवा नाहीत याचा साधा विचारदेखील अशा संघटना तसेच फाऊंडेशनकडून केला जात नाही.अर्थात अशा पुरस्कार देणार्या संस्थांची सामाजिक उंची काय,त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात अर्थच काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
काही पुरस्कार देणार्या संस्था मुख्यमंत्र्यांपासून बड्या राजकीय मंडळींना, अधिकार्यांना पुरस्कारासाठी निमंत्रित करून पुरस्काराचा गाजावाजा करण्याचा प्रयत्न करत आहेत.काही वृत्तपत्रांमध्ये थोड्या प्रमाणात जाहिराती देवून पुरस्कारप्राप्त व्यक्तींना आकर्षित करण्याचा उद्योग काही संस्थांनी सुरू केला आहे. पुरस्कार देणार्या अशा संस्थांनी यातून लाखो रुपयांची कमाई केली आहे. कोणताही सामाजिक आणि सांस्कृतिक आधार नसणार्या अशा संघटना तसेच फाऊंडेशनच्या एकूणच कारभाराची चौकशी होण्याची गरज आहे.
समाजात काही समाज मान्यताप्राप्त संस्था,तसेच संघटना कार्यरत आहेत.त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्तीही तितकीच मोठी आहे. अशा संस्थांकडून समाजातही गौरवशाली काम करणार्या व्यक्ती, संघटनांचा पुरस्काराची काही रक्कम देवून त्यांचा यथोचित गौरव केला जातो. मान्यताप्राप्त संस्था, तसेच संघटनांना तितकाच गौरवशाली इतिहास असतो.
पण,फक्त पुरस्कार देण्यासाठीच जन्माला आलेल्या संस्थांकडे पैसा कमविण्याशिवाय दुसरे कोणतेही मोजमाप नसते. बड्या राजकीय पदाधिकार्यांनी,अधिकार्यांनी पुरस्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याआधी संबंधित संघटना तसेच फाऊंडेशनची सामाजिक उंची काय? याचा विचार करणे गरजेचे आहे. बडे राजकीय पदाधिकारी तसेच अधिकारी यांची अशा कार्यक्रमांना असलेली उपस्थिती यामुळेच अशा संस्थांचे सध्या चांगलेच फावले आहे. त्यामुळेच सध्या त्यांचा आर्थिक माया गोळा करण्याचा उद्योग तेजीत आहे.









































































