सांगली । शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी कालावधी 15 सप्टेंबर 2024 पर्यत आहे.वाळवा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनाचा लाभ सुलभतेने मिळावा.पिक कर्ज, पिक विमा, नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पिक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पेऱ्याची नोंद 15 सप्टेंबरपूर्वी करावी असे आवाहन तहसिलदार पाटील यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2024 साठी क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावरुन पिक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पिक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्ती मुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट फोन मोबाईल मध्ये प्लेस्टोअर मधून ई-पिक पाहणी ॲप इंन्स्टॉल करुन, सुरु करुन त्यात पिक पाहणी/पेऱ्याची नोंद नोदवावी. काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्या गावचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशिल शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवक यांनी ई-पिक पेरा पूर्ण करुन घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकरी ॲपद्वारे पिक पेरा नोंदविण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशिल शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र स्वाक्षर स्वयंसेवकांनी ई-पिक पेरा नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही तहसिलदार सचिन पाटील यांनी कळविले आहे.