Last Updated on 05 Aug 2024 10:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या संदर्भात झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येत्या 15 ऑगस्टपर्यंत खड्डे न बुजविल्यास गुन्हे दाखल करणार, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही, यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे जिल्ह्यात चांगले काम – पालकमंत्री शंभूराज देसाई
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत 5 लाख 20 हजार 560 ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत. त्यापैकी 4 लाख 42 हजार 887 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगले काम केले आहे, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तालुकास्तरावर गठीत केलैल्या समितीची बैठक घेऊन अर्जांना मंजुरी द्यावी. ज्या तालुक्यांची बैठक अद्याप झाली नाही त्यांनी ती त्वरित आयोजित करावी. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करुन महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहूया. या योजनेसंदर्भात जिल्ह्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करु, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
महसूल पंधरवड्यात नागरिकांना योजनांचा लाभ द्यावा- पालकमंत्री श्री. देसाई
महसूल पंधरवड्यानिमित्त प्रशासन सर्वसामान्यापर्यंत पोहचवत नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले. महसूल पंधरवड्यात शेतकऱ्यांविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांना प्रत्यक्ष लाभ द्यावा. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना सूचना द्याव्यात, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही आढावा घेतला.












































































