सांगली । राष्ट्रवाद ही खूप व्यापक संकल्पना आहे.धर्म, जात, प्रांत,भाषा,भूगोल आणि संप्रदाय अशा अनेक बाबतीत कमालीची विविधता आणि भिन्नता असूनही भारतासारखा बहुसांस्कृतिक देश एकात्मता जपत आला आहे. संविधान हा या एकात्मतेचा मूलभूत पाया आहे.मात्र आज सत्तेच्या बळावर राष्ट्रवादाचा संकुचित अर्थ लावला जातो आहे.देशाच्या एकसंघतेसमोर आव्हान निर्माण केले जाते आहे.त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. अशा वेळी लोकशाहीचा खरा अर्थ सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने इस्लामपूर येथे संपन्न झालेल्या अंनिसच्या विस्तारित राज्य कार्यकारणीच्या तीन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत ‘भारतीय राष्ट्रवादाची वाटचाल’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्राचार्य आर.डी.सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
आपल्या भाषणात बेडकिहाळ पुढे म्हणाले, ‘अंधश्रद्धा निर्मूलन ही समाजातली विषमता नष्ट करणारी कृतिशील चळवळ आहे. या कामामुळे लोकशाहीला बळकटी मिळते. समतेवर आधारलेल्या निकोप समाजाची निर्मिती होते. आजच्या काळात या कामाची नितांत गरज आहे.’ यावेळी श्री. बेडकिहाळ यांच्या हस्ते आधारस्तंभ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.ॲड. सुखदेव माळी,डॉ.अरुण कोलप,डॉ.राहुल मोरे,उद्योजक श्रीनिवास आठवले,प्रा.डॉ.प्रमोद गंगनमाले,प्रा.डॉ. सुदाम माने,श्रीमती सुरेखा शिंदे,शरद साळुंखे,पूजा ऋषिराज जाधव यांना सन्मानित करण्यात आले.महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे आणि प्राचार्य आर.डी.सावंत यांची यावेळी भाषणे झाली.अंनिसचे राज्यउपाध्यक्ष शामराव पाटील,महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. एन आर पाटील,वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रा.बी.आर.आर.जाधव यांनी स्वागत केले.संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. एस.बी.माने यांनी आभार मानले.प्रा. डाॅ.तृप्ती थोरात यांनी सूत्रसंचालन केले.