सांगली । कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि कौशल्याची जोड दिल्यास नोकरी आणि व्यवसायाच्या देखील अधिक संधी मिळतील; असे प्रतिपादन ॲड. धैर्यशील पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये बी.ए. आणि बी. कॉम. भाग 3 च्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव हे होते.
यावेळी ॲड. पाटील यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी महाविद्यालयातील बी.कॉम. नंतरच्या एम. कॉम., डिप्लोमा इन टॅक्सेशनची माहिती सांगून महाविद्यालयातील इतर सोयी सुविधा, जिमखाना, एनएसएस, क्रीडा ,सांस्कृतिक विभाग या विभागांचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ए.आर. शिंदे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे हिंदी विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वय डॉ. जी. के. किर्दत यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना आम्ही विद्यार्थ्यांना मूठभर ज्ञान दिले असले तरी त्याचा वापर आपण आयुष्यभर सामाजिक आयुष्यामध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल आणि महाविद्यालयाच्या संदर्भात आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले, आणि महाविद्यालयाला भेटवस्तु दिल्या. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता कक्ष हमीच्या समन्वयक डॉ. मंगल लोंढे याही उपस्थित होत्या,सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अमोल चांदेकर यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश स्वामी यांनी केले तर आभार प्रा. पी. एन. पाटील यांनी मानले.