राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांचा शुक्रवारी (16 फेब्रुवारी) वाढदिवस.त्या निमित्ताने…
साहेब वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात आले. बघता- बघता ४० वर्षाचा काळ कधी लोटला,हे कळलेही नाही. या कालावधीत त्यांनी बापूंनी उभा केलेल्या सहकारी संस्था सक्षमपणे पुढे नेत,बापूंच्या इतकाच वाळवा तालुक्यातील जनतेला जीव लावला आहे. राज्याच्या अर्थ,गृह,ग्राम विकास आणि जल संपदामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान केलेले आहे. मला त्यांचा मुलगा म्हणून सार्थ अभिमान आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंब म्हणून आम्हास वेळ दिला आहे. कुटूंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. साहेब हे अत्यंत कुटूंब वत्सल आहेत.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आपले आयुष्य समाजाच्या सेवेस वाहून घेतले. त्यांनी लोकल बोर्डाचे प्रेसिडेंड म्हणून गांव तिथे आड आणि गांव तिथे शाळा,गावाला जोडणारे रस्ते आदी राज्यात आदर्शवत कामे केली आहेत. राज्याचे महसूल,वीज,उद्योग,अर्थ,ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना राज्याच्या जडण घडणीत मोठे योगदान केलेले आहे. त्यांनी साखराळेच्या माळावर साखर कारखाना उभा करून वाळवा तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. सहकारी बँक,सहकारी दूध संघ आदी अनेक सहकारी संस्था स्थापन करून तालुक्याच्या विकासाला गती दिली आहे. त्यांनी केवळ वाळवा तालुका नव्हे,तर संपूर्ण राज्यात अनेक सामान्य कुटूंबातील तरुण कार्यकर्त्यांना संधी देत कार्यकर्ते घडविले आहेत. बापू कुटूंब वत्सल होते. बापूंच्या अकाली निधनाने कार्यकर्ते व वाळवा तालुक्यातील जनतेच्या आग्रहाखातर साहेबांना सार्वजनिक जीवनात यावे लागले.
साहेबांनी २१ व्या वर्षी बापूंच्या विचाराने वाळवा तालुक्यात गावोगावी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून देत साखर कारखान्याच्या माध्यमातून ३७ सहकारी पाणी पुरवठा संस्था उभा केल्या. साहेबांचे हे काम वाळवा तालुक्याच्या विकासाचा पाया ठरले आहे. साहेबांचे हे काम राज्यात अद्वितीय असे आहे..आजचा समृध्द, श्रीमंत वाळवा तालुका,ही ओळख पाणी पुरवठा संस्थांच्या उभारणीतून निर्माण झाली आहे. साहेबांनी ४० वर्षाच्या कालखंडात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष,तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री,गृहमंत्री, ग्राम विकास मंत्री,आणि जलसंपदा मंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. साहेब राज्य पातळीवर प्रदीर्घ काळ कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्था यशस्वी वाटचाल करीत आहेत. तरीही इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या पांढऱ्या कपड्या वर एकही डाग नाही,ही आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. त्यांनी आपल्या कामा तून वाळवा तालुक्यातील जनतेची मान कायम उंचाविलीच आहे..राज्यातील एक उच्च शिक्षित,सुसंस्कृत,अभ्यासू,शांत,संयमी नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी स्व.बापूंचा जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेताना आपल्या कुटुंबासही वेळ दिला आहे. त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण देताना,आमच्यावर चांगले संस्कारही केले आहेत.
हेही वाचा – जयंतनिती
आपल्या मुलांनी शिकावे,मोठे व्हावे अशी प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते. साहेबां चीही तशी अपेक्षा मी,व राजवर्धनबद्दल होती. ते नेहमी सांगायचे खूप शिका,मोठे व्हा. बापू पप्पांना,काकांना (भगतदादा पाटील) म्हणायचे,’चांगले शिका. नाही तर कासेगाव ला जावून म्हैशी राखाव्या लागतील.’तसेच साहेबही मला व राजवर्धनला म्हणायचे, ‘चांगले शिका नाहीतर, कासेगावला जावून शेती करावी लागेल.’ सर्वसामान्य माणसांचे प्रश्न,समस्या खोलात जावून समजून घेत त्यांना मदतीचा हात द्यायला हवा, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे.
मी हायस्कुलमध्ये शिकत असताना, अभ्यास कमी करायचो. दरवर्षी हेड मास्तर पालकांना शाळेत बोलावून मुलांचा अभ्यासा चा रिपोर्ट द्यायचे. साहेब दरवर्षी वेळ काढून यायचे,आमचा वार्षिक रिपोर्ट समजून घ्यायचे. त्यांना जिथे आम्ही कमी वाटायचो,ते व्यवस्थित करायला आम्हाला प्रोत्साहित करायचे. माझा सायन्स हा विषय कच्चा होता. साहेब आपली कामे आटपून वेळ काढायचे. ते मला सायन्स विषय शिकवायचे. मला आठवते,केमिस्ट्रीतील पॅरॉडिकल टेबल मला त्यांनी शिकविली आहेत. आपल्या मुलांचा कोणताही विषय कच्चा राहू नये, त्यांनी सर्व विषयात पारंगत असावे,ही एका वडिलांची तळमळ त्यामागे होती. आमच्या क्रिकेटच्या मॅचेस असायच्या. पप्पा मंत्रालया तील कामे आटपून मुद्दाम वेळ काढून मॅचेस पहायला यायचे. मागे बसून ते आमचा खेळ पहायचे. मला जवळ बोलावून मॅचचे अपडेट घ्यायचे. ते आमच्या खेळाचे कौतुक करायचे.
आम्ही इस्लामपूरला विशेषतः मुंबईला असताना साहेब वेळ काढून मला, राजवर्धन ला बाहेर जेवायला घेवून जातात. आम्ही वेळ मिळेल तेंव्हा,घरी टी.व्ही.वर पिक्चर पाहतो. काही वेळा ते आम्हाला आईस्क्रीम खायला घेवून जातात. ते वडील म्हणून आम्हाला वेळ देतात.
सार्वजनिक जीवन असो,अथवा व्यवसाय. तुम्ही स्वतःच्या कामातून उभा रहायला हवे,ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. स्व. बापूंच्या अकाली जाण्याने साहेब सार्वजनिक जीवनात आले. ते वाळवा तालुका,व तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखाशी समरस झाले. लोकांचे प्रश्न,समस्या समजून घेत त्या सोडविण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या जनतेच्या जीवनात समृध्दी आणताना राज्याच्या प्रगती मध्ये मोलाचे योगदान दिले आहे,देत आहेत. ते जे काम करीत आहेत,त्याच कामात आम्हालाही आवड निर्माण झाली आहे. तेच काम आम्ही करीत आहोत. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्यासाठी झोकून देवून काम केल्यास आपण नक्की यश मिळवू,असा संदेश आम्ही त्यांच्याकडून घेतला आहे.
सध्या त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने राज्यात फिरावे लागत आहे. इकडे इस्लामपूरला मतदारसंघातील लोक, जिल्ह्यातील लोक त्यांना भेटायला येतात. मी आता साहेबांना मदत करण्याचे काम
करीत आहे. लोकांना भेटण्याचा,लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अलिकडे माझी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सध्या मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज आणि तालुक्यातील जनतेसाठी वेळ देत आहे. समाजकारणाचे धडे गिरवीत आहे. राजकारण हा यानंतरचा मुद्दा आहे.
साहेबांच्या हातून राज्यातील जनतेची अधिका-अधिक सेवा घडो,या त्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
प्रतिकदादा जयंतराव पाटील
अध्यक्ष,राजारामबापू पाटील
सहकारी साखर कारखाना
शब्दांकन – विश्वनाथ पाटसुते, प्रसिध्दी अधिकारी