हर हर महादेव …।
अंबप येथील जागृत ग्रामदैवत श्री नागनाथ देवाची माघ शुद्ध षष्ठी या दिवशी यात्रा असते.
नागोबा हे अंबप गावचे ग्रामदैवत आहे.साक्षात भगवान भोलेनाथ महादेवाचे अवतार असलेले श्रीगुरु नागनाथ मोहोळ येथील त्यांचे शिष्य हेग्रस यांच्यावर प्रसन्न होवून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे आले.मोहोळ येथे येण्यापूर्वी ते मानूर,मार्डी,देगाव या क्षेत्री काही काळ वास्तव्यास होते.यानंतर ते श्री क्षेत्र वडवळ जिल्हा सोलापूर येथे आले.नंतर श्री नागनाथ त्यांनाच सिद्ध नागेश्वर,सिद्ध नागेश,नागोबा आदी नावांनी भक्तगण ओळखतात.श्री नागनाथांचे प्रथम शिष्य हेग्रस यांची कन्या अहिल्याबाई यांचे पुत्र अज्ञानसिद्ध हे देखील नागनाथांचे आवडते शिष्य होते.त्यांच्या आज्ञेनुसार अज्ञानसिद्ध ,दत्त चैतन्य, सिद्ध चैतन्य (सिद्धोबा),भैरमभट्ट, वर्धम्मा (वरदायिनी) ही भक्तमंडळी गुरु उपदेशानुसार नागनाथांचे शिष्य आलमप्रभू यांची भेट घेऊन नरंदे येथील बनात वनराईत वास्तव्य करु लागली.मार्गशीर्ष नवमी दिवशी अज्ञानसिद्धांनी आपले गुरु श्री नागनाथांना अत्यंत भावभक्तीने कळकळीने हाका मारण्यास सुरुवात केली.नागनाथ देव आपल्या भक्तासाठी दिव्य ज्योतिर्मय स्वरुपात प्रकट झाले.
त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले.पुढे माघ शु.पंचमी दिवशी अज्ञानसिद्धांनी नरंदे येथे समाधि घेतली माघ शुद्ध षष्ठी दिवशी पंचक्रोशीतील सर्व लोक नरंदे बनात दर्शनास येऊ लागले.तेव्हापासून तेथे चतुर्थी ते सप्तमीपर्यंत यात्रा भरते.तसेच अंबप येथे माघ शुद्ध षष्ठी दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो.
पंतप्रधान मोदींनी ‘पीएम सूर्य घर’ योजनेची केली घोषणा, आता दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज
पीएम किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम
या देवतेच्या संदर्भात पूर्वीच्या लोकांच्याकडून एक आख्यायिका सांगितली जाते.अंबप येथील संभाप्पा माळी हे नागोबा देवाचे परमभक्त होते.नागनाथावर त्यांची मनापासून भक्ती होती.गावी नागनाथाचे मंदिर नव्हते.त्यामुळे अंबप पासून वीस किलोमीटर अंतरावर
असणारे गाव म्हणजे नरंदे,या गावचे ग्रामदैवत नागोबाला रोज न चुकता अंबप मधून डोक्यावर पाण्याची घागर घेवून पायी अनवानी चालत जावून आणि आपणाकडे कोणी पाहत नाही अशा वेळी म्हणजे भल्या पहाटे नागोबा देवास पाणी घालून बेल , फुले वाहून प्रथम पूजा करुन परत अंबप गावी परत येत असत.
एकवेळ स्वतःचे भोजन चुकेल पण यांचा पाणी घालण्याचा नागोबाच्या पुजेचा त्यांचा नित्य नियम कधीच चुकला नाही.यामुळे नरंदे गावातील पुजारी व ग्रामस्थांना आपल्या ग्रामदैवताची आपल्या अगोदरच कोण पहाटेचं प्रथम पूजा करून जात असते हा प्रश्न पडला व ते पाहण्यासाठी सर्वजण नरंदे येथील बनात रात्री दबा धरुन बसले.भक्तवत्सल श्री नागनाथ भगवंतानी ही गोष्ट जाणली व एकही दिवस न चुकता सलग बारा वर्ष म्हणजे एक तप माझी पूजा करणाऱ्या परम भक्ताच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून व त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होवून ,स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला की ,तू इकडे एवढ्या लांब येऊन पाणी घालून माझी पुजा करण्यापेक्षा मीच तुझ्या गावी गावापासून जवळच दगडी पाषाणात प्रकट होईन.तू आता नरंदे गावी येवू नकोस. अंबप गावाजवळच एक गाय रोज येवून एका दगडी पाषाणा वर स्वतःच्या स्थनातून दुधाचा वर्षाव करते आहे.त्या ठिकाणी मी आहे.तू त्या ठिकाणी माझी स्थापना करुन पूजा कर.
दृष्टांत दिल्याप्रमाणे संभाप्पा माळी यानी अंबप गावी नागनाथाची स्थापना केली.यात्रेची सुरवात परंपरेनुसार अंबपचे परंपरागत गावकामगार पोलिस पाटील यांचे उपस्थितीत यात्रेची सुरवात होते.सर्वात शेवटी त्यांचा मानाचा गलेफ देवास अर्पण करून उत्तरपूजा केली जाते.पंचमीस माळी,शिंदे,डोंगरे व इतर भक्तांकडून नागनाथ देवास वड्या भाकरी दही भात आंबील नैवेद्य अर्पण केला जातो.रात्री नागोबाच्या उत्सवमुर्तीची पालखीतून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते.
माघ शुद्ध षष्ठीला पहाटे माळी समाजातील पुजारी नागनाथांना अभिषेक करतात.यानंतर नागनाथ भक्त अंबप गावातून मंदिरापर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतर दंडस्नान घालत येतात. त्यांची सोडवणूक पुजारी करतात.यानंतर दुपारी पोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो.
या यात्रेसाठी वाजंत्र्याचा मान म्हणून वाकुर्डे येथील वादकांना मिळाला.वाजंत्री असे सांगतात की एक वर्ष आम्ही या यात्रेसाठी आलो नाही तर आमच्या घरी अनेक साप निघाले,त्यापासून ही वादन परंपरा आम्ही खंडित न करता पुढील पिढीने ही पुढे चालू ठेवली आहे आणि तो आम्ही आमचा मान समजतो.श्री नागनाथ देवाच्या दैनंदिन पूजा करण्याचा मान माळी समाज बांधवाना आहे.मानाच्या सासनकाठ्या उभी करण्याचा मान अंबप येथील श्री नागनाथ देवाचे पुजारी माळी,सुतार समाज व माने समाजास आहे.तसेच यात्रेदिवशी दगडी चाके असलेल्या बैलगाडींची मिरवणूकीचा मान अंबप येथील शिंदे,डोंगरे समाज व अंबपवाडी येथील खाडे, सादळकर समाजास आहे. तर दिवटीचा मान चर्मकार समाजास आहे .तसेच यात्रेच्या मुख्य दिवशी अंबप गावातील श्री नागनाथ भक्तांच्या घरातून देवाचे पुजारी व वाजंत्री मानाचा गलेफ व नैवेद्य वाजत गाजत मंदिराकडे घेऊन जातात.
सायंकाळी चार वाजता गावकामगार पोलिस पाटील,गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती,भक्तगण पारंपारिक वाद्यांच्या गजरात व वाकुर्डे येथील वाजंत्र्यांच्या वाद्यांच्या गजरात गावचावडी पासून मंदिरापर्यंत वाजतगाजत देवाच्या दर्शनास जातात. तेथे पुजारी मानाच्या बैलगाडा पूजन करुन मंदिरास प्रदक्षिणा घातली जाते.
वाकुर्ड्यांच्या वाजंत्र्याचा मंजूळ पिपाणीचा आवाज कानावर पडला की नागोबा यात्रा सुरू झाली हे कोणालाही सांगावे लागत नसत.त्या आवाजाचा एक वेगळाच नादब्रह्म अंबप गावात पसरायचा .यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी वड्या भाकरीच्या प्रसादाची चव तर फारचं वेगली.पालखीच्या वेळी पारंपरिक वाद्ये,गावातील बँड, लेझिम पथक तसेच वाकुर्ड्याची वाजंत्री,यांच्या सुमधुर पारंपारिक वाद्यांत यात्रेचा मनमुराद आनंद घेत,नागोबाच्या सासनकाठ्या नाचवत नाचवत गावातील नागोबा मंदिर,महादेव मंदिर ते चावडी पर्यंत मिरवणूक निघताना लौकिक व आध्यात्मिक आनंद मिळायचा.तो आनंद किती मिळायचा हे शब्दांत सांगणे फारच कठीण.
यात्रेदिवशी नागोबाच्या दर्शनाला,नागोबाच्या मळ्यात चालत जाताना,मानाच्या बैलगाड्या गाड्या कधी अचानक उधळतील याचा नेम नसायचा.त्या मागून अनेक गाड्यांची रांग एक वेगळंच दृष्य.रमणीय,विलोभनीय.
गुलाल माखलेल्या कपडयात अनेक जणांच्या भेटीगाठी होत.जुन्या आठवणींच्या गप्पांगोष्टी करत, यात्रेचा मनमुराद आनंद लुटायचा.
यात्रेतील गर्दी,आइस्क्रीमच्या,गाड्या मिठाईची मांडलेली दुकाने,खेळणी,रस्त्याने वाजत असणार्या यात्रेतील पिपाण्या,लहान मुलांच्या हातातील फुगे, डोळ्यांना खेळण्यातील चष्मा. हातात घातलेले यात्रेतील खोटे घड्याळ हे दृश्य पाहताना एक वेगळेच चैतन्य असायचे.
पुरण पोळीवर ताव मारलेला असूनही ,यात्रेच्या ठिकाणी गोल करुन शेव चिरमुरे खाण्यातला आनंद वेगळाच.
पण आज मात्र या यात्रेतील आनंदाला मुकत चाललो की, काय? असे वाटते 3हे कारण’ आज पारंपरिक वाद्याच्या जागी डाॅल्बी साऊंडने जागा घेतल्यामुळे ही पारंपारिक वाजंत्री आपली इमाने इतबारे सेवा करूनही, या डॉल्बीच्या साऊंड मुळे त्यांचा आवाज कानावर येत नाही.त्यामुळे हा सर्व आनंद गमावतो की काय असे वाटू लागले आहे. ना शांत मनाने देवाच दर्शन घेता येतं की, एकमेकांशी गप्पागोष्टी, संभाषणे करु शकत, कानावर हात न ठेवता त्या ठिकाणी दोन मिनिटे ही मंदिर परिसरात नाही थांबू शकत. वयस्कर माणसाची तर आत्ता जीव जातो की नंतर अशी परिस्थिती होत आहे. तरी नागोबा यात्रा डॉल्बी ध्वनिप्रदूषणमुक्त करून पारंपारिक वाद्यांत यात्रा साजरी करण्यासाठी नवीन पिढीला व यात्रा कमिटीला विनंती आहे.
या लेखन संकलनासाठी विशेष सहकार्य डॉ .जयवंत खारकांडे अंबप यांचे आहे .
शिवा भुजिंगा शिवा पार्वती हर हर महादेव ।
शेख नसरुद्दीन दस्तारो धिन्।
या जयघोषामूळे,हिंदू – मुस्लिम समाजाचे ऐक्य साधणारी यात्रा.
पाटील समाजातील गावकामगार पोलिस पाटील यांचा मानाचा गलेफ देवास अर्पण करून उत्तरपूजा करुन या यात्रेची सांगता होते.
नागनाथाच्या वरती वडवळ मोहोळ,नरेंदे श्रीक्षेत्री संकट हरणी ग्रंथाचे पारायण केले जाते.आपण ही या ग्रंथाचे पारायण करून आपल्या जीवनात आलेले संकट निवारण करून,अध्यात्मिक उन्नती साधू शकाल.
ॐ नागनाथाय नमः
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)