सांगली । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव (ता.वाळवा) या जन्मगांवी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,लोकशाहीर वामनदादा कर्डक व लोकशाहीर अमर शेख यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणारे पहिले शाहिरी,लोककला संमेलन रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी घेण्याचा निर्णय राज्यातील शाहीर व पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
ही बैठक वाटेगाव येथील क्रांतिवीर देशभक्त बर्डेगुरुजी स्मारकमध्ये पार पडली.सामाजिक कार्यकर्ते कॉ.डॉ.भारत पाटणकर,माजी सभापती रविंद्रकाका बर्डे,शाहीर शीतल साठे,कॉ.धनाजी गुरव,सचिन गरुड,शाहीर सचिन माळी,शाहीर सदाशिव निकम,जेष्ठ पत्रकार विजय मांडके प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.भारत पाटणकर म्हणाले,वाटेगाव येथील बर्डेगुरुजी स्मारकामध्ये रविवार दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 7 या वेळेत हा महोत्सव होणार आहे. राज्यातील लोकशाहीर आणि लोक कलावंत सहभागी होणार आहेत. विविध समितींच्या माध्यमातून जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून लोक सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
रविंद्रकाका बर्डे म्हणाले,क्रांतिकारी विचार व चळवळीस गती देण्यासाठी आपण हे संमेलन घेत आहोत. राज्यातील लोकशाहीर व लोक कलावंतांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी.
शाहीर शीतल साठे म्हणाल्या,गेल्या 5-6 वर्षांपासून वाटेगाव येथे राज्यातील शाहिरां च्या वतीने अण्णाभाऊंना मानवंदना कार्यक्रम करीत आहोत. पुढचा टप्पा म्हणून हे संमेलन घेत आहोत. भविष्यात संमेलनाची व्याप्ती व स्वरूप वाढविण्याचा प्रयत्न असेल.
कॉ.धनाजी गुरव म्हणाले,आपण प्रथम तिन्ही लोकशाहिरांच्याबद्दल चर्चा करून लोक कलावंताच्या कलेचे सादरीकरण ऐकू. यातून वैचारिक बांधिलकी मानणाऱ्या कलावंतांशी संवाद सुरू होईल.
कॉ.सचिन गरुड म्हणाले,मोदी-शहांच्या फॅसिझममध्ये गांवगाड्यातील लोक कलावंतां ची कला ऐकण्याचा,त्यांच्याशी संवाद करण्या चा प्रयत्न हवा. क्रांतिकारी शाहिरांच्या नांवे पंधरवडा जाहीर करून साहित्य संमेलना सारखे आपणासही पैसे द्यावेत,अशी मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी शाहीर सचिन माळी तासगाव,योगेश साठे वाटेगाव,विनोद बल्लाळ कापुसखेड यांच्यासह अनेकांनी आपली मते मांडली.
यावेळी शाहीर तुळशीराम जाधव संगमनेर, शाहीर रणजित कांबळे पुणे,शाहीर जालिंदर घिघे राहुरी,अमर पुणेकर,कॉ.जयंत निकम, शाहीर रमेश बल्लाळ भाटवडे,अनिकेत मोहिते पुणे,भास्कर सदाकळे सावर्डे,पत्रकार आनंदा थोरात कराड,पत्रकार सागर गोतपागर,हारुण मुल्ला,योगेश साठे,जनार्दन साठे वाटेगाव, विजय दणाणे आष्टा,विश्वनाथ पाटसुते,मिलिंद पाटसुते,नामदेव पाटसुते, संतोष गोटूल कासेगाव यांच्यासह संपूर्ण राज्यातून आलेले शाहीर,पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते व अण्णाभाऊ प्रेमी उपस्थित होते.