पुणे । कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे.
या सरळसेवेच्या कोट्यातील 2 हजार 588 रिक्त पदे विचारात घेता याच्या 80 टक्के म्हणजे 2 हजार 70 कृषी सेवक पदासाठी प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी देण्यात आला आहे.तो प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल,अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामूळे शासन निर्णयातील तरतूदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादित पदभरती करण्यात येणार आहे. गट- क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय.बी.पी.एस या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे.या संस्थेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे.त्यानुसार वरिष्ठ लिपिक,सहायक अधिक्षक,लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.