राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्राचे माजी मंत्री,राज्याच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तीमत्व मा.जयंतराव पाटील यांचा १६ फेब्रुवारी २०२३ रोजी वाढदिवस संपन्न होत आहे.राजकारण, शिक्षण,सहकार,क्रीडा,शेती,उद्योग,पर्यटन,कला,सांस्कृतिक या विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याला अभिमान वाटेल अशी लक्षवेधी कामगिरी नोंदवणाऱ्या या अलौकिक व सर्वस्पर्शी,अनुभवसंपन्न व्यक्तीमत्वाचा वाढदिवस ! त्या निमित्ताने…
🌑 जयंतनिती – प्रा.डॉ.संजय थोरात,इस्लामपूर
🌑 कुटूंब वत्सल..पप्पा – प्रतिकदादा जयंतराव पाटील
🌑 पित्याचे स्वप्न साकार करणारा,कर्तबगार सुपुत्र जयंतराव पाटील – अॅड.बाबासाहेब मुळीक,विटा
🌑 सहकारातील जाणते नेते,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील – पी.आर.पाटील (दादा)
🌑 विकास कामांचा महामेरू,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील – विजयबापू पाटील,साखराळे
जयंतनिती
वसंतदादांच्यानंतर सांगली जिल्हयाच्या राजकारणावर निर्वीवाद वर्चस्व आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना यश आले आहे. दादांच्या काळातील सांगली हे निर्णय प्रक्रियेचे केंद्र आता जयंत पाटील यांच्या रूपाने इस्लामपूरला आले आहे.साठीत पदार्पण करणाऱ्या जयंत पाटील यांनी अविरत कष्टाने ही वाटचाल पूर्ण केली आहे.स्वतःची नवी जयंतनिती विकसित केली आहे.
1962 ला राजारामबापू विधानसभेत निवडून गेले. यावेळी जन्म झालेल्या जयंत पाटील यांचे नाव त्यामुळेच जयंत ठेवण्यात आले. 1984 ला बापूंचे निधन होईपर्यंत जयंत पाटील यांचा राजकारणाशी संबंध नव्हता. उलट त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून उत्तम बांधकाम व्यावसायिक व्हायचे होते. पदव्युत्तर शिक्षणासाठी जयंत पाटील अमेरिकेलाही गेले होते. मात्र बापूंच्या अचानक जाण्यामुळे जयंत पाटलांच्या जगण्याचे संदर्भ बदलले.बापूंचा मोठा मुलगा म्हणून जयंत पाटील यांचे मोठे बंधू भगतदादा यांनीच राजकारणात यावे असा बापूप्रेमी कार्यकर्त्यांचा आग्रह होता.मात्र भगतदादांनी जयंत पाटील यांना राजकारणासाठी पुढे चाल दिली.सात वेळा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जयंत पाटील यांनी अनेकवेळा विजयानंतर वाळवा तालुक्यातील सभांतून त्यांच्या राजकारण प्रवेशाचा हा किस्सा सांगितला आहे.
बापूंच्या निधनावेळी बापू जनता पक्षात होते.जयंतरावांनी सार्वजनिक जीवनाला सुरवात करताना राजकीय पक्षाऐवजी नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजारामबापू कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले.सुरवातीला बापूंच्या आकस्मिक निधनामुळे जयंतराव खचून गेले होते.मला इस्लामपूरातील अंबाबाई मंदिरातील कार्यकर्त्यांची एक बैठक आठवते.जयंतराव बोलायला उभे राहिले.‘बापू’ एवढा एकच शब्द बोलले आणि त्यांना रडू कोसळले.पण जिद्दी जयंतराव हळूहळू सावरले.वाळवा तालुक्यातील जमीन सिचंनाखाली आणण्यासाठी राजारामबापूंनी 50 हजार एकर क्षेत्राचे पाणी परवाने घेतले होते.जयंतरावांनी या उपसा जलसिचंन योजना कार्यान्वित करण्यासाठी मेहनत घेतली. बॅंक, कारखाना व उपसा जलसिंचन योजना यांचे त्रिपक्षीय करार करून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हिरवाई आणली.सुरवातीच्या काळात कुठल्याही पक्षात न जाता कार्यकत्र्यांचे संघटन,बापूंच्या संस्था सक्षम करणे यावर भर दिला.सुरवातीच्या काळात बापूंच्या पराभव करण्यास कारणीभूत असलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर भर असे.पण नंतर हे स्वरूप बदलून जयंतरावांनी बेरजेच्या राजकारणाला सुरवात केली.एकत्र आल्याशिवाय विकास नाही हे सूत्र स्वीकारून वाळवा तालुक्यातील विरोधकांना मित्र करायला सुरवात केली.गरज आणि बेरीज यांचा ताळमेळ घालीत विलासराव शिंदे यांचा गट आपल्याबरोबर राहील अशी व्यवस्था केली.
इस्लामपूर नगरपालिकेत आपल्या गटामार्फत तर आष्टा येथे शिंदे गटाशी एकत्रीकरण करत मतदारसंघातील इस्लामपूर व आष्टा या दोन महत्वाच्या शहरावर आपले वर्चस्व राखले.नजीकच्या शिराळा मतदारसंघात आधी शिवाजीराव नाईक व नंतर मानसिंगराव नाईक यांना साथ दिली.बापूंच्या नंतर सुरवातीला काही काळ वसंतदादा यांच्याशीही सहकार्य केले.वाळवा विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली की,जयंतरावांचा गट जिंकणार असे चित्र निर्माण करण्यात यश आले.वाळवा तालुक्यात प्रभावी विरोधक होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.प्रश्नावर लढणारे ज्येष्ठ नेते नागनाथ नायकवडी,एन.डी.पाटील यांच्याशी थेट संघर्ष टाळला.अन्य नेत्यांच्या सहकारी संस्थातील निवडणुकांबद्दल सुरक्षित अंतर ठेवले.सुरवातील वाळवा,शिराळा या आपल्या होमग्राऊंडवर कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण करण्यावर भर दिला.वाळव्यातील निर्णायक वर्चस्वामुळे हळूहळू जयंतराव जिल्हा स्तरावरील दखलपात्र नेते बनले.
अर्थात जयंतरावांचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला तो राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर! कॉँग्रेसपक्ष सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयही जयंतरावांची कसोटी होती.पूर्वी राजारामबापूंचा पराभव होण्यामागचे एक प्रमुख कारण त्यांचे पक्षांतर होते.त्यामुळे जयंतराव खूप सावध होते.त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठका घेतल्या.निर्णय सर्वसमावेशक बनवून आपल्याबरोबर जिल्हयातील विष्णूआण्णांचा गट राहील याची काळजी घेतली.तालुक्यात पर्यायी गट उभा राहू नये म्हणून विलासराव शिंदे यांच्याबरोबर मनोमीलन घडवून आणले.राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्हा स्तरावरील नेतृत्वाला गती आली.त्यांना 17 वर्षे कॅबीनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले.राजारामबापू यांना मानणारे जिल्हाभरातील नेते,कार्यकर्ते जयंतरावांच्या तंबूत आले.राष्ट्रवादीचे दुसरे प्रभावी नेते आर. आर. पाटील (आबा) यांच्याशी त्यांचा छुपा तर कॉँग्रेसचे मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्याशी त्यांचा उघड संघर्ष राहिला.
प्रत्येक तालुक्यातील प्रमुख स्पर्धक नेत्याचे विरोधक जयंतरावांच्या संपर्कात असतात.सांगली जिल्हा परिषद,महानगरपालिका,जिल्हा मध्यवर्ती बॅंक येथे जयंतरावांचे वर्चस्व निर्माण झाले.विरोधी गटांशी संधान या प्रक्रियेमुळे जेजेपी (जयंत जनता पार्टी) असा शब्द देखील रूढ झाला होता.नेते व गटांचे ध्रुवीकरण या प्रक्रियेत अधूनमधून भाजपचे आव्हान देखील निर्माण झाले.सध्या सांगली जिल्हयातील कोणत्याही मतदारसंघात निवडणूकीत जयंतरावांचे समर्थन अथवा छुपा पाठिंबा कोणाला हे समीकरण कायम चर्चेत असते.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना जयंतरावांनी मतदारसंघाला अभिमान वाटेल अशी विकासकामे पूर्ण केली आहेत.मंत्रीपदाचा वापर करून निधी खेचून आणण्यात आणि आपले विरोधकांची एकजूट न होण्यात जयंतराव पटाईत आहेत. 2016 चा अपवाद वगळता इस्लामपूर शहरात जयंतरावांचे समर्थकच सत्तेत आहेत.
सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक,सांगली महानगरपालिका येथे राष्ट्रवादी सत्तेत आहे.सहकारी कारखान्याची शाखा काढून दाखवण्याची किमया त्यांनी साधली आहे.सहकारी साखर कारखानदारीवर त्यांचे जिल्हाभर वर्चस्व आहे.लोकानुयायी निर्णय न घेता आर्थिक परिस्थितीवर आधारित निर्णय घेत राहिल्यामुळे ते सक्षम कारखानदार आहेत.सांगली जिल्हयातील कारखानादारीवरील वर्चस्वाबरोबर नजीकच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणूकात देखील त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्वाची असते.कृष्णेच्या निवडणूकीत लढत दुरूंगी असो अथवा तिरंगी असो प्रचारात जयंत पाटील यांच्या नावाचा वापर सर्व गटांना करावा लागतो.
आज सांगली जिल्हयाच्या राजकारणात सुरवातीला मंत्री झाल्यानंतर जयंत पाटील व आर. आर. पाटील यांच्या नावाला जे वलय होते त्यात आता बदल झाला आहे.जयंतराव प्रस्थापित नेते झाले आहेत.या प्रस्थापित होण्यामुळे अनेकवेळा थोडीशी पिछेहाटही सहन करावी लागली आहे.खास करून वाळवा शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकात स्थानिक गटातील राजकारणामुळे सत्ता राखण्यात यश आले असले तरी विरोधकांना देखील दखलपात्र यश मिळाले आहे.जयंतराव प्रस्थापित असल्यामुळे काहीवेळा विरोधकांना स्पेस (अवकाश) मिळाला आहे.जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर टिकेची झोड उठवत विरोधकांनी आपले अस्तित्व राखले आहे.जयंत पाटील गटात कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि गर्दी लक्षणीय आहे.या गर्दीची गुणवत्ता वाढवणे हे समस्या सुरवातीपासून आजही टिकून आहे.या धामधुमीत अनेकवेळा सोयीसाठी जवळ केलेला गटच आव्हान देण्याची उदाहरणे देखील घडली आहेत.विरोधकांकडे मंत्रीपद असले की ते देखील जयंत पाटील यांच्या विरोधात ताकदीने उभा राहू शकतात हे सिध्द झाले आहे.
सभ्य व सुसंस्कृत नेता ही आपली इमेज प्रतिमा जपण्यासाठी जयंतराव नेहमी दक्ष असतात.मतदारसंघात जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान,ऊस,दूधासाठी उपक्रमशील कार्यक्रम यांत सातत्य आहे.मंत्रीपदाच्या कालावधीत अनेक प्रशासकीय इमारती,नाटयगृह,पाणीपुरवठा योजना,नाना पाटील स्मारक, उद्याने अशी कामे उभारली जिल्हाभरात नेतृत्व करताना आपल्या भोवतीचे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मोहोळ हटणार नाही याची ते दक्षता घेतात.या गर्दीची गुणवत्ता वाढवण्याचा ते सतत प्रयत्न करतात.आपले कार्यकर्त्यांचे मोहोळ जपण्यासाठी व विकासकामे गतीमान करण्यासाठी जयंत पाटील यांची स्वतंत्र संपर्क यंत्रणा आहे.जयंत पाटील इस्लामपूर शहरात असले की त्यांचा मुक्काम राजारामबापू कारखाना परिसरात असतो.चार खोल्यांचा बंगला,हिरवळ याला लागून त्यांचे संपर्क कार्यालय आहे.बंगल्याच्या आवारात एक झोपाळा व काही खुर्च्या आहेत.याच बंगल्याच्या आवारात राजकीय चर्चा रंगतात.बंगल्या लगत असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून लोकांची गर्दी जमायला सुरवात होते.सकाळी थोडा अल्पोपहार आणि ब्लॅक टी चा आस्वाद घेतल्यानंतर त्यांचा जनसंवाद सुरू होतो. प्रसन्न चेहऱ्याने सर्वांकडे हसरा कटाक्ष टाकत संपर्क कार्यालयात प्रवेश करतात.लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात पत्रावर शेरे मारतात.आवश्यक तेथे फोनाफोनी घडते.महत्वाचे बोलायचे त्यांना जयंत पाटलांच्या गाडीत बसायला जागा मिळते.प्रचंड आश्वासकता हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा स्थायीभाव आहे.संपर्क दौऱ्यात पहिल्या भेटीचे गाव आले की बऱ्याचवेळा गाडीतील माणसे बदलतात.नवा संवाद सुरू होतो.
जयंत पाटील गटात ब्लॅक टी,कार्यक्रम करणे हे शब्द रूढ आहेत.वाळवा तालुक्यातील सभा बैठकातून जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा अनेकवेळा व्यक्त करण्यात येते.मात्र,‘थंडा करके खावो’ या उक्तीनुसार जयंत पाटील या विषयावर थेट बोलणे टाळतात.कुणी मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला तर ते केवळ स्मितहास्य करतात.1995 पासून आपल्या राज्यात कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे आघाडीच्या राजकारणाच्या मर्यादांची त्यांना जाणीव आहे.आपण पात्र पण प्रतीक्षेत आहोत ही बाब ते केवळ स्मितहास्याने दाखवतात.जयंत पाटील यांच्याकडे सार्वजनिक जीवनासाठी लागणारी प्रचंड उर्जा आहे.अर्थमंत्री असताना मोठा अपघात झाला असताना देखील त्यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला होता.निवडणूकांचे व्यवस्थापन कौशल्य ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची जमेची बाजू आहे.रात्री उशीरापर्यंत कारखाना कार्यस्थळावरील व्ही.आय.पी गेस्टहाऊसवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून देखील दुसऱ्या दिवशी त्यांचा उत्साह कायम असतो.बऱ्याचवेळा प्रवासातच डुलकी काढण्यात ते वाक्बगार आहेत.प्रश्नांची चर्चा करताना सर्व तपशील उपलब्ध करून घेण्याकडे त्यांचा भर असतो.चर्चा सुरू असताना स्वतः नोट्स घेणे ही त्यांची कार्यपध्दती आहे.कार्यकर्त्यांचा गराडा आणि भेटणाऱ्या नागरिकांची सततची गर्दी जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनली आहे.
सर्वांशी अनौपचारिक स्नेहभाव व सतत फुलणारे स्मितहास्य यांची प्रसन्न पखरण सुरू असते.त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला आपले काम होईल असा विश्वास वाटतो.निवडणूक प्रचार काळात ते मोटरसायकल,जीप, ट्रॅक्टर अशा मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात.विरोधकांकडून दीर्घकाळ टीका झाल्यावर नर्मविनोदी शैलीत प्रतीपक्षाची खिल्ली उडवतात. विरोधकांचा, ‘आमचे मित्र’ असा उल्लेख करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात त्यांचा भ्रमणध्वनी हा एक स्वीयसहायक आहे.सभा सभारंभ सुरू असताना मोबाईलवरील संदेशवाचन सतत सुरू असते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील अविचल निष्ठा आणि कर्तबगारी यांच्या जोरावर जयंत पाटील सांगली जिल्हयासाठी महत्वाची सार्वजनिक उपलब्धी बनले आहेत भगतदादा आणि जयंत पाटील यांच्यापैकी जयंत पाटील राजकारणात आले.आता नव्या पिढीत प्रतीक आणि राजवर्धन या दोन मुलांपैकी प्रतीक पाटील यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
कुटूंब वत्सल..पप्पा,
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील
साहेब वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात आले. बघता- बघता ३७-३८ वर्षाचा काळ कधी लोटला,हे कळलेही नाही. या कालावधीत त्यांनी बापूंनी उभा केलेल्या सहकारी संस्था सक्षमपणे पुढे नेत बापूंच्या इतकाच वाळवा तालुक्यातील जनतेला जीव लावला आहे. राज्याच्या अर्थ,गृह,ग्राम विकास आणि जल संपदामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान केलेले आहे. मला त्यांचा मुलगा म्हणून सार्थ अभिमान आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंब म्हणून आम्हास वेळ दिला आहे. कुटूंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. साहेब हे अत्यंत कुटूंब वत्सल आहेत.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आपले आयुष्य समाजाच्या सेवेस वाहून घेतले. त्यांनी लोकल बोर्डाचे प्रेसिडेंड म्हणून गांव तिथे आड,आणि गांव तिथे शाळा,गावाला जोडणारे रस्ते आदी राज्यात आदर्शवत कामे केली आहेत. राज्याचे महसूल,वीज,उद्योग,अर्थ,ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना राज्याच्या जडण घडणीत मोठे योगदान केलेले आहे. साखराळेच्या माळावर साखर कारखाना उभा करून वाळवा तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. सहकारी बँक,सहकारी दूध संघ आदी अनेक संस्था स्थापन करून तालुक्याच्या विकासाला गती दिली आहे. त्यांनी केवळ वाळवा तालुका नव्हे,तर संपूर्ण राज्यात अनेक सामान्य कुटूंबातील तरुण कार्यकर्त्यांना संधी देत कार्यकर्ते घडविले आहेत. बापू कुटूंब वत्सल होते. बापूंच्या अकाली निधनाने कार्यकर्ते,व वाळवा तालुक्यातील जनतेच्या आग्रहाखातर साहेबांना सार्वजनिक जीवनात यावे लागले.
साहेबांनी २१ व्या वर्षी बापूंच्या विचाराने वाळवा तालुक्यात गावोगावी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून देत साखर कारखान्याच्या माध्यमातून ३७ सहकारी पाणी पुरवठा संस्था उभा केल्या,हे साहेबांचे काम वाळवा तालुक्याच्या विकासाचा पाया ठरले आहे. साहेबांचे हे काम राज्यात अद्वितीय असे आहे..आजचा समृध्द, श्रीमंत वाळवा तालुका ही ओळख पाणी पुरवठा संस्थांच्या उभारणीतून निर्माण झाली आहे. साहेबांनी ३८ वर्षाच्या कालखंडात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राज्य साखर संघाचे अध्यक्ष,तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, गृहमंत्री,व ग्राम विकास,आणि जलसंपदा मंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. साहेब राज्य पातळीवर प्रदीर्घ काळ कार्यरत, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्था यशस्वी वाटचाल करीत आहेत,तरीही इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या पांढऱ्या कपड्यावर एकही डाग नाही,ही आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. त्यांनी आपल्या कामा तून वाळवा तालुक्यातील जनतेची मान कायम उंचाविलीच आहे..राज्यातील एक उच्च शिक्षित,सुसंस्कृत,अभ्यासू,शांत, संयमी नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी बापूंचा जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेताना आपल्या कुटुंबासही वेळ दिला आहे. त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण देताना,आमच्यावर चांगले संस्कारही केले आहेत.
आपल्या मुलांनी शिकावे,मोठे व्हावे अशी प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते. साहेबां ची तशी अपेक्षा मी,व राजवर्धनबद्दल होती. ते नेहमी सांगायचे खूप शिका,मोठे व्हा. बापू पप्पांना,काकांना (भगतदादा पाटील) म्हणायचे,’चांगले शिका. नाही तर कासेगाव ला जावून म्हशी राखाव्या लागतील.’तसेच साहेबही मला व राजवर्धनला म्हणायचे, ‘चांगले शिका नाहीतर, कासेगावला जावून शेती करावी लागेल.’ सर्वसामान्य माणसांचे प्रश्न,समस्या खोलात जावून समजून घेत त्यांना मदतीचा हात द्यायला हवा, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे.
मी हायस्कुलमध्ये शिकत असताना, अभ्यास कमी करायचो. दरवर्षी हेड मास्तर पालकांना शाळेत बोलावून मुलांचा अभ्यासा चा रिपोर्ट द्यायचे. साहेब दरवर्षी वेळ काढून यायचे,आमचा वार्षिक रिपोर्ट समजून घ्यायचे. त्यांना जिथे आम्ही कमी वाटायचो,ते व्यवस्थित करायला आम्हाला प्रोत्साहित करायचे. माझा सायन्स हा विषय कच्चा होता. साहेब आपली कामे आटपून वेळ काढायचे. ते मला सायन्स विषय शिकवायचे. मला आठवते,केमिस्ट्रीतील पॅरॉडिकल टेबल मला त्यांनी शिकविली आहेत. आपल्या मुलांचा कोणताही विषय कच्चा राहू नये, त्यांनी सर्व विषयात पारंगत असावे,ही एका वडिलांची तळमळ त्यामागे होती. आमच्या क्रिकेटच्या मॅचेस असायच्या. पप्पा मंत्रालया तील कामे आटपून मुद्दाम वेळ काढून मॅचेस पहायला यायचे. मागे बसून ते आमचा खेळ पहायचे. मला जवळ बोलावून मॅचचे अपडेट घ्यायचे. ते आमच्या खेळाचे कौतुक करायचे.
आम्ही इस्लामपूरला विशेषतः मुंबईला असताना साहेब वेळ काढून मला, राजवर्धन ला बाहेर जेवायला घेवून जातात. आम्ही वेळ मिळेल तेंव्हा,घरी टी.व्ही.वर पिक्चर पाहतो. काही वेळा ते आम्हाला आईस्क्रीम खायला घेवून जातात. ते वडील म्हणून आम्हाला वेळ देतात.
सार्वजनिक जीवन असो,अथवा व्यवसाय. तुम्ही स्वतःच्या कामातून उभा रहायला हवे,ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. स्व. बापूंच्या अकाली जाण्याने साहेब सार्वजनिक जीवनात आले. ते वाळवा तालुका,व तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखाशी समरस झाले. लोकांचे प्रश्न,समस्या समजून घेत त्या सोडविण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी वाळवा तालुक्याच्या जनतेच्या जीवनात समृध्दी आणताना राज्याच्या प्रगती मध्ये मोलाचे योगदान दिले आहे,देत आहेत. ते जे काम करीत आहेत,त्याच कामात आम्हालाही आवड निर्माण झाली आहे. तेच काम आम्ही करीत आहोत. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्यासाठी झोकून देवून काम केल्यास आपण नक्की यश मिळवू,असा संदेश आम्ही त्यांच्याकडून घेतला आहे.
सध्या त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने राज्यात फिरावे लागत आहे. इकडे इस्लामपूरला मतदारसंघातील लोक, जिल्ह्यातील लोक त्यांना भेटायला येतात. मी आता साहेबांना मदत करण्याचे काम
करीत आहे. लोकांना भेटण्याचा,लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या समाजकारणाचे धडे गिरवीत आहे. राज कारण हा यानंतरचा मुद्दा आहे.
साहेबांच्या हातून राज्यातील जनतेची अधिका-अधिक सेवा घडो,या त्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!
प्रतिकदादा जयंतराव पाटील
युवा नेते
अध्यक्ष, राज्य व्हॉलीबॉल असो.
शब्दांकन- विश्वनाथ पाटसुते
प्रसिध्दी अधिकारी
पित्याचे स्वप्न साकार करणारा,कर्तबगार सुपुत्र जयंतराव पाटील !
१९७० च्या दशकात आम्ही प्राथमिक शाळेत असताना खुजगांव येथे ७६ टीएमसीचे धरण व्हावे,याकरिता लोकनेते राजारामबापूं नी मोठे आंदोलन उभे केले होते. या धरणाचे पाणी सांगली जिल्ह्यातील मिरज पुर्व, कवठेमहांकाळ,जत या तालुक्यांना पाटाने मिळणार होते. दुष्काळी भागातील लोकांचे बापू नेतृत्व करीत होते. परंतु राजकीय लढाईत खुजगाव येथील ७६ टीएमसीचे धरण रद्द होऊन ३४ टीएमसीचे चांदोली धरण मंजूर झाले. १९८४ साली दुर्दैवाने बापू आपल्यातून निघून गेले आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचे बापूंचे स्वप्न अपूर्ण राहिले. बापूंच्या नंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे जयंतराव पाटील राजकारणामध्ये आले. त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात करीत असताना बापूंनी कृष्णा आणि वारणा नदीवरून वाळवा तालुक्यासाठी पाणी उचलण्यासाठी पाणी परवाने घेतले होते,त्या पाणी परवान्याच्या आधारे वाळवा तालुक्यात पाणी पुरवठा संस्था स्थापन करून,हरित क्रांती केली. त्याकाळात ते जत,कवठेमहांकाळ,खानापूर, आटपाडी,तासगाव,मिरज या दुष्काळी पूर्व भागात फिरत असताना तेथील लोक वाळवा तालुक्यासारखे आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्यावे,एवढीच मागणी करीत होते.
दरम्यानच्या काळात ताकारी,म्हैसाळ योजनांना मंजुरी मिळाली. १९९० साली त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी विधानसभेत वेळोवेळी दुष्काळी भागातील पाणी योजनांच्या संदर्भात पाठपुरावा केला. १९९६-९७ मध्ये टेंभू योजनेला मान्यता मिळाली. १९९९ साली आघाडी सरकारमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी ३८ वर्षीय जयंतरावांच्या हाती राज्याच्या अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी दिली. त्यांनी अर्थ संकल्प मांडत असताना वेळोवेळी सांगली जिल्ह्याच्या पूर्व दुष्काळी भागातील जनता त्यांच्या नजरेसमोर येत होती. ताकारी, म्हैसाळ,टेंभू या योजनांसाठी शक्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न केला. परंतु अनुशेषामुळे दुष्काळी भागाला न्याय देण्यात अडचणी येत होत्या. त्यांनी २००२ ते २००४ च्या भीषण मा.राज्यपाल डॉ.महंमद फजल यांचा दुष्काळी भागाचा दौरा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न करून अनुशेषा तून काही निधी दुष्काळी भागाला देण्यासाठी प्रयत्न केले.
अर्थमंत्री म्हणून जयंतराव पाटील यांनी सलग १० अर्थसंकल्प मांडत असताना दुष्काळी भागाकरिता असणाऱ्या ताकारी, म्हैसाळ,टेंभू या योजनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या योजना पूर्ण होण्यास वेळ लागत होता. त्यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत विरोधी पक्षात काम करीत असताना दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न जोरदारपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु सांगली जिल्ह्यातील काही गावे अजूनही पाण्यापासून वंचित असलेची खंत त्यांना कायम जाणवत होती.
२०१९ मध्ये सत्तांतर झाले आणि महा विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या सरकारमध्ये त्यांना मागेल ते खाते मिळेल अशी परिस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे या सरकारमधील अर्थ, गृह अशी मोठी खाती उपलब्ध होती. या खात्यांसाठी त्यांचे नावही घेतले जात होते. परंतु त्यांनी स्व.बापूंचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिसली म्हणून त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला आणि पवार साहेबांकडे जलसंपदा खाते द्यावे असे सूचित केले. त्यांनी जलसंपदा खात्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर अधिकारी वर्गासोबत बैठका घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, कृष्णा खोरे लवादाच्या निर्णयानुसार ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते. त्या पाण्यामधून ताकारी योजनेसाठी ९.३४ टीएमसी पाणी ७० गावासाठी, म्हैसाळ योजनेसाठी १७.४४ टीएमसी पाणी १७१ गावांसाठी,तर टेंभू योजना २२.०३ टीएमसी पाणी २४० गावांसाठी,याप्रमाणे पाणी दिलेले होते. उर्वरित गावांची पाण्याची मागणी होती. त्यांनी कृष्णा खोरे लवादाच्या निर्णयाचा अभ्यास केला. त्यावेळी सुधारित लवादाच्या निर्णयानुसार ८१ टीएमसी जादा पाणी कृष्णा खोऱ्यामध्ये उपलब्ध आहे,असे त्यांना दिसून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी जत तालुक्यातील ६५ गावांना वारणा धरणातून ६ टीएमसी पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दि. ११/०८/२०२१ रोजी घेतला. ही योजना जाहीर केल्यानंतर त्यांनी जत तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी जत तालुक्यात प्रवेश केल्यापासून संखपर्यंत तालुक्यातील लोकांनी अतिशय उस्फुर्तपणे त्यांचे स्वागत केले. सदर योजनेसाठी टप्पा क्र.१ म्हैशाळ टप्पा क्र. ३ बेडग ते बसाप्पाचीवाडी नाला, टप्पा क्र.२ बसाप्पाचीवाडी ते मिरवाड तलाव, टप्पा क्र.३ मिरवाड तलाव ते मल्याळ वितरण हौद असे तीन टप्प्यात पाणी उचलण्याची योजना त्यांनी मंजूर केली.या योजनेची वितरण व्यवस्था बंद नलिका प्रणालीमध्ये सर्वसाधारण ४६२ किमी इतक्या लांबी मध्ये करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे टेंभू योजनेपासून खानापूर ११, आटपाडी १२, तासगाव ५, कवठेमहांकाळ ९, जत ४, खटाव २१, माण २७ अशी गावे वंचित होती. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या दि. २९/०४/२०२२ चे पत्राने टेंभू विस्तारित उपसा सिंचन योजनेस फेर नियोजनाव्दारे ८ टीएमसी पाणी उपलब्ध करणेबाबतच्या प्रस्तावास त्यांनी मान्यता दिली. खानापूर ११ व तासगाव ५ गावांसाठी टेंभू टप्पा क्र. ३ ब, खानापूर तासगाव कळवामधून टप्पा क्र.६ अ आणि ६ ब उपसा सिंचन योजना,तर आटपाडी तालुक्यातील ५ गावे व माण २७, खटाव २१ गावांसाठी टेंभू टप्पा क्र.३ अ ते घाणंद कालव्यावरून उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. तर तासगाव तालुक्या तील १२ व कवठेमहंकाळ तालुक्यातील ९ गावांसाठी टप्पा क्र. ५ चे पंप वाढीव कालावधीसाठी चालवून,तर जत ४ गावांसाठी कवठेमहांकाळ कालव्यावरून स्वतंत्र वित्रीका काढून व सांगोला तालुक्यातील ८ गावांसाठी घाणंद सांगोला कालव्यावरून वित्रीका काढून पाणी देण्याची योजना त्यांनी प्रस्तावित केली आहे. जलसंपदा विभागाच्या पातळीवर या सर्व कामांची कार्यवाही सुरु आहे. अशा रितीने त्यांनी जलसंपदामंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये म्हैशाळ विस्तारित योजनेतून जत तालुक्यातील ६५ गावांमधील ६५,४५५ एकर म्हणजे २६५०० हेक्टर,तर टेंभू विस्तारित योजनेतून खानापूर,तासगाव, कवठेमहांकाळ,जत,आटपाडी,खटाव,माण, सांगोला या तालुक्यातील १०९ गावातील १,०२,५०० एकर म्हणजे ४१,००० हेक्टर क्षेत्राला १४ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून या भागातील दुष्काळ हटविण्यास त्यांनी मदत केली आहे.
त्यांनी जलसंपदामंत्री म्हणून महाराष्ट्रा तील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन तेथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून संपूर्ण महाराष्ट्रातील जलसंपदा विभागासंदर्भात लोकांच्या पाण्यासंदर्भातील मागण्या व अडचणी या सर्वांचा आढावा घेणारे ते कदाचित महाराष्ट्रातील पहिले जलसंपदामंत्री असतील. यामध्ये समुद्राकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वाळविण्यासंदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. निळवंडेसारख्या धरणासंदर्भात काही महत्वाचे निर्णय झाले आणि अनेक योजनांना गती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
नुकत्याच घडलेल्या राजकीय घटनांमुळे महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप व अन्य लोकांनी नवीन सरकार तयार केलेले आहे. आलेल्या सत्तेचा लोकांच्यासाठी वापर केला पाहिजे,ही स्व.बापूंची शिकवण त्यांनी मंत्रिपदाच्या २०-२२ वर्षाच्या काळात कायम पाळली. ते नव्यानेच मंत्री झाले नसल्याने सत्ता गेली व मंत्रिपद गेले याचे दुःख त्यांना नाही. परंतु दुष्काळी भागाला पाणी देण्या साठी जे नियोजन त्यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने केलेले होते,त्याची गती कमी होऊन दुष्काळी भागाला पाणी देण्या साठी वेळ लागतोय कि,काय अशी शंका निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या पुढील काळात या सर्व दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या सर्व नियोजित योजनांचा पाठपुरावा ते करतील आणि जिल्ह्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतील,याची खात्री आहे.
जयंतराव पाटील यांनी सांगलीचे पालकमंत्री म्हणून दि.२६ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्याला संबोधित करताना जिल्ह्या तील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा संकल्प जाहीर केलेला होता. त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पुढील काळामध्ये प्रयत्नशील राहतील. लोकनेते राजारामबापूंचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणे व जिल्ह्या तील एकही गाव पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणारे जयंतराव पाटील यांचेकडे पाहून पित्याचे स्वप्न साकार करणारा कर्तबगार सुपुत्र,असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. अशा या असामान्य नेतृत्वाला आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा….!
अॅड.बाबासाहेब मुळीक,विटा
कार्याध्यक्ष,सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस
सहकारातील जाणते नेते,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील
आम्ही बापूंच्याकडे जात होतो,तेंव्हा मा.साहेब लहान होते. त्यावेळी बापूंनी त्यांची एक-दोनदा ओळख करून दिली होती, इतकाच त्यांच्याशी माझा परिचय होता. मात्र बापूंच्या अकाली निधनाने १९८४ साली मा.साहेबांना अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात यावे लागले. ते वाळवा तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले. त्यावेळी मी साखर कारखान्याचा संचालक असल्याने आमचा जवळून परिचय झाला. पुढे ते आमदार,मंत्री झाले. मी कारखान्याचा काही महिने उपाध्यक्ष व आजअखेर चेअरमन आहे. त्यामुळे माझा व त्यांचा गेल्या ३८ वर्षाचा दृढ परिचय असून त्यांचा स्वभाव,गुण व कार्य जवळून पहाण्याची संधी मला मिळाली आहे.
मा.साहेब हे कुशाग्र बुध्दीचे प्रगल्भ नेते आहेत. त्यांच्यामध्ये भविष्य काळाची पाऊले ओळखण्याची फार मोठी क्षमता आहे. त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन असून त्यांनी आपल्या समूहातील सहकारी संस्थांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या अधिक कार्यक्षम चालविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न केला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक गोष्टी बाजूला ठेवत नाविन्यपूर्ण बाबींचा स्वीकार करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे.
आपल्या तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आणण्याचे स्व.बापूंचे स्वप्न होते. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्याने हे स्वप्न अपुरे राहिले. मा.साहेबांनी सार्वजनिक जीवनात आल्यानंतर प्रथम हे काम हाती घेतले. त्यांनी स्व.बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत तालुक्यातील गावोगावी पदयात्रा काढल्या. शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून सांगितले,आणि कारखान्याच्या माध्यमातून ३४ सहकारी पाणी पुरवठा संस्था उभा केला. त्यामुळे तालुक्यातील ५० हजार एकर जमीन ओलिताखाली येवून तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली,नव्हे तालुक्यात आर्थिक क्रांती झाली. हे काम तसे सोपे नव्हते. कारण ३०-३५ वर्षापूर्वी या संस्था उभारण्याचा खर्च ४८ कोटी रुपये होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर भू विकास बँकेचे कर्ज घेवून हा निधी उभा करावयाचा होता. अर्थात या कर्जाच्या परतफेडीची हमी कारखान्याने घेतली होती,आणि यानंतरही जे १२ कोटी अधिक खर्च लागला, तो कारखान्याने घातला. अशा पध्दतीने ६० कोटी रुपयांच्या ३४ पाणी पुरवठा संस्था उभा राहिल्या. मा.साहेबांची कुशाग्र बुध्दी,दूरदृष्टी आणि अथक परिश्रमातून हे डोंगराएवढे काम उभा राहील. आजचा वाळवा तालुका हा राज्यातील एक श्रीमंत आणि प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो,त्याचे श्रेय स्व.बापू व मा.साहेबांना आहे.
मा.साहेब गेल्या १०-१५ वर्षापासून आम्हाला सातत्याने सांगत आहेत,इथून पुढे साखर एके साखर निर्मिती करून सहकारी साखर कारखानदारी चालणार नाही. कारण भविष्यात साखर उद्योगासमोर अनेक अनेक आव्हाने,संकटे उभा रहाणार आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांनी साखर निर्मिती बरोबर इतर उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधायला हवेत. त्याची प्रचिती आम्हास संपूर्ण देशात प्रथम एका साखर कारखान्याची दुसरी शाखा वाटेगाव-सुरुल येथे उभा केली,त्यावेळी आली. मा.साहेबांच्या दूरदृष्टीतून ही शाखा उभा करताना इनबिल्ट १२ मेगावॅट विज निर्मिती प्रकल्पही उभा करण्यात आला. त्यावेळी १ मेगावॅट विज निर्मिती प्रकल्प उभा करण्यास ४ कोटी रुपये खर्च येत असताना हा १२ मेगावॅट विज निर्मिती प्रकल्प केवळ १२ कोटीमध्ये उभा केला आहे. त्यातून कारखान्याचा एक उत्पन्नाचा नवा स्रोत उभा राहिला. त्यावेळी दोन साखर कारखान्यातील अंतर १५ किलोमीटर हवे, असा शासनाचा नियम होता. मा.साहेब हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्याने त्यांनी हा वाटेगाव- सुरुल शाखेचा स्पॉट शोधून काढला होता. हा परिसर म्हणजे वाटेगाव-सुरुल आणि करमाळे च्या मध्यावर एका टेकडीचा होता. ही शाखा उभा करताना नैसर्गिक उताराचा इतका चांगला वापर केला आहे, ज्यामुळे खर्चात मोठी बचतही झाली आहे. पुढे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची राज्य परिषद या शाखा कार्यस्थळावर झाली,त्यावेळी सर्वांनी मोठे कौतुक केले. देश -परदेशातील अनेक मान्यवर व तज्ञांनी या शाखेस मुद्दाम भेट देवून पहाणी केली आहे. राज्यात ज्या-ज्या साखर कारखान्याकडे ऊसाची उपब्धता वाढली आहे,त्यांनी आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याची पारंपारिक पध्दतीचा अवलंब केला आहे. मात्र मा.साहेबांनी आमच्या कारखान्याकडेही ऊसाची उपब्धता वाढल्यानंतर गाळप क्षमता वाढ या पारंपारिक पध्दतीचा अवलंब न करता नाविन्यपूर्ण मार्गाचा अवलंब केला. म्हणजे देशातील पहिली सहकारी साखर कारखान्या ची शाखा वाटेगाव-सुरुल येथे उभा केली.
मा.साहेबांनी आमच्या साखर कारखान्यासह राजारामबापू उद्योग समूहा तील सर्वच संस्थांच्यामध्ये सातत्याने नव- नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार केलेला आहे. त्यातून खर्चात बचत करून संस्थांच्या प्रगतीस अधिक चालना दिलेली आहे. आमच्या साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल,कारंदवाडी व तिप्पेहळळी- जत या चारही शाखा अधिक कार्यक्षमतेने वाटचाल करीत आहेत.
मा.साहेबांनी आपल्या समूहातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध कामांच्या साठी प्रोत्साहन देत कामगिरी पूर्ण झाल्या नंतर त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थापही मारली आहे. आमच्या साखराळे युनिटची गाळप क्षमता ४ हजार मेट्रीक टन होती. ती ७ हजार करून येथे २८ मेगावॅट विज निर्मिती प्रकल्प उभा करावयाचा होता. मात्र या विस्तारासाठी जागेची मोठी अडचण होती. अन्यथा काही इमारती पाडाव्या लागणार होत्या. त्यावेळी मा.साहेबांनी मी व कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांना बोलवून घेतले आणि “स्व.बाबासोदादा (साखराळेचे सुपूत्र,स्व.बापूंचे निकटवर्तीय, कारखान्याचे माजी चेअरमन) हयात असते, तर त्यांनी मला चार दिवसात ही जागा उपलब्ध करून दिली असती. तुम्ही काय करणार आहात? असा प्रश्न केला. मी व विजयबापू लगेच कामाला लागलो. आम्ही स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने आठ दिवसात ७२ गुंठे जागा खरेदी केली. आता कारखान्याच्या विज निर्मिती प्रकल्पा तील विज बोरगाव येथील ११० केव्ही सब स्टेशनमध्ये वाहून नेण्यासाठी १७ टॉवर करण्यासाठी ३४ गुंठे जमिनीची आवश्यकता होती. ही जागाही आम्ही स्थानिक कार्यकर्त्यां ना बरोबर घेवून मिळविली. मा.साहेबांनी आमच्या कामगिरीचे मोठे कौतुक केले, त्यावेळी आम्हालाही एक कामगिरी फत्ते केल्याचे समाधान मिळाले.
मा.साहेब गेल्या ३८ वर्षापासून तालुका, जिल्हा व राज्याच्या सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी नेहमी जेष्ठ व युवकांमध्ये योग्य समन्वय राखला,तसेच समाजातील विविध घटकांना बरोबर घेवून राजकारणाच्या पलीकडे जावून त्यांनी समाजाचा सर्वांगिण विकास केला आहे,हे त्यांच्या यशस्वी कार्य-कर्तृत्वाचं गमक आहे.
पी.आर.पाटील (दादा)
अध्यक्ष,राज्य साखर संघ, मुंबई
चेअरमन,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना
विकास कामांचा महामेरू,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,राज्याचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
मला साखराळे गावचा सरपंच,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा उपाध्यक्ष आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून मा.साहेबांच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
मा.साहेबांनी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष,वाळवा तालुक्याचा सप्तपदी आमदार आणि राज्याच्या मंत्रि मंडळातील अर्थ,गृह,ग्रामविकास व जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी पाहिली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जी-जी जबाबदारी मिळाली, ती-ती जबाबदारी त्यांनी स्वतःला झोकून देऊन प्रामाणिकपणे पार पाडली आहे,त्या संधीचे सोने केलेले आहे. हा आजच्या नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे १९८४ साली अकाली निधन झाले,आणि साहेबांना अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात यावे लागले. त्यांच्यावर अगदी तरुण वयात कारखान्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी वेळ देवून कारखान्याची प्रगती तर केलीच,मात्र त्यांनी गावोगावी पदयात्रा काढून कारखाना पुरस्कृत सहकारी पाणी पुरवठा योजना उभा केल्या,आणि वाळवा तालुक्यात आर्थिक क्रांती घडवून आणली. हे त्यांच्या आयुष्या तील सर्वात महत्वाचे काम आहे. मा.साहेबांनी अथक परिश्रमाने उभा केलेल्या पाणी पुरवठा संस्था या वाळवा तालुक्याच्या प्रगतीचा मूळ स्रोत ठरल्या आहेत..
साहेब गेल्या ३८ वर्षापासून वाळवा तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत. ते सप्तपदी आमदार आहेत. संपूर्ण राज्यात असे फार कमी विधानसभा मतदार संघ आहेत,तिथे सलग ५,६,७ वेळा आमदार म्हणून निवडून दिले जात आहे. वाळवा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास साहेब हे आपले कुटुंब प्रमुख वाटतात,वाळवा तालुक्या तील प्रत्येक गावास साहेब हे आपल्या गावचे वाटतात,आणि समाजातील प्रत्येक घटकाला साहेब हे आपले वाटतात,हे मा.साहेबांच्या यशाचे गमक असावे।। मा.साहेब १८-१८ तास काम करतात. गावा-गावांच्या,मतदार संघाच्या तालुक्याच्या विकासाचा ध्यास त्यांना लागलेला असतो. वाळवा तालुक्यात प्रशासकीय इमारत,पोलीस स्टेशन,कोर्ट इमारत,उपजिल्हा रुग्णालय,गावागावातील शाळा,समाज मंदीर,मुख्य चौक व देवूळ, नदीवरील घाट,रेठरेहरणाक्ष पूल,मौजे डिग्रज- कसबे डिग्रज पूल,दुधगाव पूल, बोरगाव बंधारा,गावांना जोडणारे रस्ते,गावातील अंतर्गत रस्ते अशी किती तरी कामे सांगता येतील,जी साहेबांना केली आहेत.
१९९९ साली साहेब हे प्रथम राज्याचे अर्थ मंत्री बनले. राज्य आर्थिक दृष्ट्या अडचणीत होते. त्यांनी यशस्वीपणे अनेक उपाय-योजना केल्या आणि राज्य दुरुस्त केले. सलग १० अर्थ संकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नांवे असून त्यांनी राज्यात सर्व प्रथम सामाजिक न्यायाचा अर्थ संकल्प मांडलेला आहे. राज्यात २६/११ चा हल्ला झाला आणि आर आर आबांना गृहमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यावेळी मा.साहेबांच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी अगदी ९ महिन्यात पोलीस दल सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ५ वर्षे राज्याचे ग्राम विकास मंत्री ओढ सांभाळले. त्यांनी इको व्हिलेज सारखी गावा- गावांना समृद्ध करणारी योजना राज्यात राबविली. ग्राम पंचायत ना थेट निधी दिला, ग्राम पंचायतींच्या संगणकीकरण केले आणि गावोगावी श्रमदानातून कोटयवधी झाडे लावली. त्यावेळी ग्रामविकास खात्याचा देशात सलग ३ वेळा प्रथम क्रमांक मिळाला. त्यांनी जल संपदा खात्याची जबाबदारी जाणीवपूर्वक स्वीकारली आणि राज्यातील असंख्य मागे पडलेल्या पाणी योजनांना गती दिली आहे. कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित भागास पाणी देण्याचे नियोजन केलेले आहे.
मा.साहेबांना २०१९ मध्ये सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. यावेळी त्यांनी वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्याच्या विकासाला गतिमान केले. त्यांनी या काळात अशी २-४ कामे केली आहेत की,ज्याचा जिल्ह्याच्या पुढील अनेक पिढ्यांच्यावर चांगला परिणाम होणार आहे. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल,तो म्हणजे मॉडेल स्कुल,स्मार्ट पीएसी,वाकुर्डे बु: योजना आणि जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावांना पाणी देण्याचे नियोजन या कामांचा…दर्जेदार शिक्षण हे सध्या प्रगतीची गुरुकिल्ली बनले आहे. ही काळाची गरज ओळखून मा.साहेबांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा वाढविण्यासाठी जिल्ह्यात मॉडेल स्कुल हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून केवळ इमारती,शौचालये, पिण्याचे पाणी आदी सुविधा वाढविणे अपेक्षित नसून शैक्षणिक दर्जा वाढविणे हे मुख्य ध्येय आहे. त्यांनी हाती घेतलेला दुसरा अत्यंत महत्वाचा उपक्रम म्हणजे स्मार्ट पीएसी..सध्या दवाखाना म्हंटले की,सामान्य माणसाच्या अंगावर काटा मारतो. कारण अगोदरच महागाई,बेकारी आणि विविध अडचणींनी बेजार सामान्य माणसाला आरोग्याचा खर्च परवडत नाही. म्हणून अगदी खाजगी आरोग्य सेवेच्या तोडीस-तोड आरोग्य सुविधा,तीही मोफत देण्याचा मा.साहेबांचा प्रयत्न आहे. या दोन्ही उपक्रमांना त्यांनी जिल्हा नियोजनमधून आर्थिक तरतूदही केलेली आहे. त्यामुळे ही कामे गतीने पूर्ण होतील,यात काही शंका नाही. आपल्या सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात वाकुर्डे बु: ही पाणी योजना बहुचर्चित आहे. या योजनेस मा.साहेबांनी ३०० कोटींचा निधी दिल्याने या योजनेच्या कामास अभूतपूर्व गती मिळाली आहे. ही योजना शिराळा व वाळवा तालुक्यास वरदान ठरणार आहे. मध्यंतरी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, आमच्या पाण्याची व्यवस्था करा,नाही तर आम्ही इतर राज्यात जाण्याचा कठोर निर्णय घेवू. या ६५ गावांना वारणा धरणांमधून ६ टीएमसी पाण्याची व्यवस्था मा.साहेबांनी केलेली आहे.
मा.साहेब हे उच्च शिक्षित,शांत,संयमी व एक अभ्यासू नेते आहेत. त्यांची राहणी अगदी साधी आहे. ते विरोधकांच्या टीका-टिपण्णी पेक्षा विकासकामांना, सामान्य माणसाचे जीवन सुखी व समृध्द करण्यास प्राधान्य देतात. मात्र अगदीचे अति झाले असेल,तर नक्की ‘करेक्ट कार्यक्रम’ हा ठरलेला..अशा या कर्तृत्वान नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
विजयबापू पाटील,साखराळे
तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
उपाध्यक्ष,राजारामबापू सह.साखर कारखाना
शब्दांकन – विश्वनाथ पाटसुते,प्रसिध्दी अधिकारी