Last Updated on 31 Oct 2022 10:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
औरंगाबाद । पैठण संतनगरीत वारकर्यांसाठी स्वतंत्र बँकेची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा रोजगार हमी योजनामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली. वारकर्यांना पैशांसाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज पडू नये म्हणून स्वतंत्र बँकेची घोषणा केल्याचेही भुमरे यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भुमरे यांना मंत्रिपदासोबतच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले.त्यामुळे उल्हासित झालेल्या भुमरे यांनी यंदा दिवाळीनिमित्त प्रथमच ‘संत स्नेहभेट’ कार्यक्रमाचे आयोजन केले.स्नेहमिलनासाठी संत ज्ञानेश्वर संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर,शिवानंद महाराज शास्त्री,भवरमहाराज,नामदेव पोकळे महाराज, विठ्ठल शास्त्री चनघटेमहाराज यांच्यासह संत-महंतांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भुमरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
उपस्थित संत मंडळींनी आपल्या समस्या या संमेलनात मांडल्या.महंतांनी मठांचा विकास करण्याची मागणी केली. त्याला भुमरे यांनी उत्तर दिले. प्रत्येक मठाला भेट देऊन त्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पैठण घाटावर आरती, एकनाथी भागवत मंदिर आणि वारकर्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले. उपस्थित संतांचे मंत्री भुमरे यांनी पूजन करून त्यांचा सन्मान केला. महाराष्ट्रात प्रथमच असे संत संमेलन भरवण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.












































































