हुबालवाडी येथे स्वराज्य ग्रुपने लावलेले डिजिटल बोर्ड घेत आहेत लोकांचे लक्ष वेधून !
सांगली । वाळवा तालुक्यातील हुबालवाडी परिसरात ठीकठिकाणी लावलेले डिजिटल बोर्ड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.आमचं ठरलंय…यंदा सीमोल्लंघन करायचंय ! असा आशय असलेले बोर्ड सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.नजीकच्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुबालवाडी येथील युवकांनी लावलेले हे बोर्ड सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
वाळवा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या दोन-तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे.शासकीय पातळीवर या निवडणुकांबाबत अनिश्चितता असली तरीही ग्रामीण भागात या निवडणुकांचे वारे आतापासूनच सुरु झाले आहेत.ग्रामीण भागामध्ये प्रस्तापितांच्या कार्यपद्धतीवर युवावर्ग नाराज असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसू लागले आहे.त्यातूनच युवा वर्गामध्ये काही ठिकाणी विकासाचा नवा विचार पुढे येताना दिसत आहे.
हुबालवाडी येथे स्वराज्य ग्रुपचे आमचं ठरलंय…यंदा सीमोल्लंघन करायचंय ! असा आशय असलेले डिजिटल बोर्ड ठीकठिकाणी झळकले आहेत.दसऱ्याच्या मुहूर्तावर हुबालवाडी-बहे रस्त्यावर अनेक ठिकाणी तसेच गावात हे बोर्ड लावण्यात आले आहेत.हुबालवाडी गावाला खराब रस्ते,तुंबलेली गटारं,दुषीत पाणी,वाढलेली रोगराई,बेरोजगारी,व्यसनाधिनता,भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचंय.त्यासाठीच घेऊन येत आहोत गावच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट…असा मजकूर असलेले हे बोर्ड लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हुबालवाडी येथे युवकांचा स्वराज्य ग्रुप कार्यरत आहे.संगणक अभियंता अक्षय तानाजी फुलारे याने सांगितले की,सध्या निवडणूक लढवण्याचा कोणताही मानस नाही.प्रस्थापितांनी आम्ही तयार केलेल्या गावच्या ‘विकासाची ब्ल्यूप्रिंट’ नुसार काम केल्यास आम्ही त्यांना मदत करू अन्यथा युवावर्गाला सक्रिय व्हावे लागेल.
दरम्यान,येत्या काळात ग्रामीण भागात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांतील चित्र कसे असेल हे नक्की सांगता येत नसले तरीही युवकांचा ‘आमचं ठरलंय’ चा नारा सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे हे मात्र नक्की !