Last Updated on 13 Nov 2021 10:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
देशातील नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या असून मिलिंद तेलतुंबडे याला पकडण्यासाठी ५० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
गडचिरोली |
कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा कमांडर मिलिंद तेलतुंबडे मारला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पार पडलेल्या या कारवाईमध्ये 5 जवान सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याचसोबत दंडकारण्य भागाताला आणखी एक मोठा नक्षल नेते जोगन्ना,विजय रेड्डी, संदीप दीपकराम हे देखील चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना,विजय रेड्डी,संदीप दीपकराम हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते.
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात काही नक्षलवादी हालचाल सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारच्या रात्रीपासूनच पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना त्या जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला असता नक्षल्यांना जशाच तसे प्रतिउत्तर पोलिसांनी दिले. या चाललेल्या दिवसभराच्या धुमश्क्रीत २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून २६ मृतदेह हस्तगत केले असून पुन्हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाने नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून अधिक जवानांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे कोण आहे ?
एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे.1 मे 2019 रोजी झालेला आयईडी स्फोट मिलिंद तेलतुंबडे यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तो आरोपी असून फरार आहे.एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.50 ला रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता.त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो.
गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे’ अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असेही त्यांनी सांगितले. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली, असे गृहमंत्री म्हणाले










































































