Last Updated on 07 Aug 2023 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती
सांगली ।“मेरी माटी मेरा देश” अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “मेरी माटी मेरा देश” या अभियानामध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे,असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देशित केले असून जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व 696 ग्रामपंचायतींमध्ये नियोजन करण्यात आले आहे. दि. 4 ते 10 ऑगस्ट 2023 दरम्यान “मेरी माटी मेरा देश” अनुषंगाने गावात प्रचार व प्रसिध्दी करणे,गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इत्यादी) शिलाफलक बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
दि. 7 ते 9 ऑगस्ट 2023 दरम्यान “मेरी माटी मेरा देश” अभियान अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा उपक्रम, शिलाफलक उद्घाटन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रत्येक गावातून आणलेली माती एका कलशामध्ये पंचायत समिती स्तरावर गोळा केली जाणार आहे. हा कलश दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान राज्य स्तरावरील कार्यक्रमासाठी व दिनांक 27 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. हा कलश दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घेऊन एका युवकाची निवड केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.












































































