Last Updated on 16 Jul 2025 9:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा कालावधी ५ वर्ष करण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय व्हाट्स ॲपवर फिरत आहे. हा शासन निर्णय हा खोटा असून, जनतेच्या फसवणुकीचा प्रकार आहे. असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता दि.०९.०७.२०२४ च्या शासननिर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत पूर्वी सहा महिने तर सध्या हा कालावधी वाढवून ११ महिन्यांसाठी कार्यप्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतिमाह ६०००, आयटीआय अथवा पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह ८०००,पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह १०,००० इतके विद्यावेतन देण्यात येते हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असते, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात आली आहे.












































































