Last Updated on 23 Sep 2022 7:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
6 राज्यांमधल्या निवडक जिल्ह्यांमध्ये 1.10 लाख औषधी रोपांची लागवड
फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती आणि वनौषधी सहज आणि परवडण्याजोग्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात पोषण वाटिकांची निर्मिती
नवी दिल्ली । महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयुष मंत्रालयासोबत संयुक्तपणे हाती घेतलेल्या विविध उपक्रमांतर्गत देशभरातील सुमारे 4 लाख 37 हजार अंगणवाडी केंद्रांनी पोषण वाटिकांची निर्मिती केली आहे. त्याशिवाय 6 राज्यांमधल्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये 1 लाख 10 हजार औषधी रोपांची लागवड करण्यात आली आहे.
हा महिना देशभरात पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे. या पोषण माह – 2022 अंतर्गत, पोषण-उद्यान उभारण्याचे उपक्रम देशभरात मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत. त्यात पोषण उद्यानाच्या मागच्या भागात कुक्कुटपालन किंवा मत्स्यपालन एककेही उभारली जात आहेत.
या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत, अशा प्रकारची कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन एकके असणाऱ्या दीड लाखापेक्षा जास्त पोषण वाटिका देशभरात उभारण्यात आल्या आहेत.
बालके, किशोरवयीन मुले, गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे पोषण योग्य प्रकारे होईल, याची खातरजमा करणे, हे 8 मार्च 2018 रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाचे उद्दिष्ट आहे.
फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती आणि वनौषधी सहज आणि परवडण्याजोग्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात उभारल्या जाणार्या पोषण वाटिका किंवा पोषण-उद्यान, हे योग्य प्रकारचे पोषण प्रदान करण्याच्या प्रयत्नांमधले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. पोषण उद्यानातून किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्रातून महिला आणि बालकांना स्थानिक पातळीवर उत्पादित फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींचा ताजा आणि नियमित पुरवठा व्हावा,या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.













































































