Last Updated on 10 Nov 2023 11:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । दूरसंचार विभाग ही भारतातील दूरसंचार क्षेत्रासाठी धोरणे, कार्यक्रम आणि नियामक आराखडा तयार करण्यासाठीची नोडल संस्था असून नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे,दूरसंचार विभाग संपूर्ण देशात विश्वसनीय आणि सुरक्षित संचार सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करते.
दूरसंचार विभागाकडून दोन तासांत मोबाईल क्रमांक खंडित केले जातील असा दावा करणाऱ्या आक्षेपार्ह कॉल्सबद्दल दूरसंचार विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला दिला आहे.अशा प्रकारचे कॉल हे व्यक्तींना फसवण्याचा आणि संभाव्य शोषण करण्याचा फसवा प्रयत्न आहे.
मुख्य माहिती :
- दूरसंचार विभाग नागरिकांना सेवा खंडीत करण्याची धमकी देणारे कॉल करत नाही.
- नागरिकांना असे कॉल आल्यास सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
- दूरसंचार विभागाद्वारे सुचवलेली खबरदारी:
- पडताळणी: जर तुम्हाला कॉल खंडीत करण्याची धमकी देणारा कॉल आला तर कोणतीही वैयक्तिक माहिती सामायिक करू नका.तुमच्या सेवा प्रदात्यांसोबत अशा कॉलची सत्यता पडताळून पहा
- दक्ष रहा : दूरसंचार विभाग दूरध्वनी कॉलद्वारे सेवा खंडीत करण्याचा इशारा देत नाही,हे लक्षात ठेवा. असा कोणताही कॉल संशयास्पद मानला पाहिजे.
- घटना नोंदवा : राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल https://cybercrime.gov.in वर कोणत्याही संशयास्पद कॉलची तक्रार करा.
दक्ष राहणे,माहितीची पडताळणी करणे आणि कोणत्याही संशयास्पद घडामोडीची त्वरित तक्रार करणे यावर दूरसंचार विभाग भर देतो. या फसव्या कॉलच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संभाव्य शोषणापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विभाग कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांसोबत काम करत आहे.












































































