Last Updated on 27 Oct 2021 1:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.देशाच्या राष्ट्रपतींकडून दरवर्षी २९ ऑगस्टला दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची नावे पुढे आली आहेत.टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया,ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन,फुटबॉलपटू सुनील छेत्री,महिला क्रिकेटपटू मिताली राज,हॉकीपटू पीआर श्रीजेश यांच्यासह एकूण 11 खेळाडूंची खेल राष्टासाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णासह दोन पदके जिंकून इतिहास रचणारी महिला पॅरा नेमबाज अवनी लेखरा आणि क्रिकेटपटू शिखर धवन यांच्यासह ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी आयोजित केला जात होता परंतु यावर्षी तो लांबणीवर पडला आहे. कारण केंद्र सरकारला खेळाडूंच्या निवडीत टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील खेळाडूंच्या कामगिरीचा समावेश करायचा होता. पॅरालिम्पिक स्पर्धा या वर्षी 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान टोकियो येथे पार पडल्या. यादरम्यान भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली आणि ऑलिम्पिक-पॅरालिम्पिक इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली.
नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ऍथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले,तर अवनी लेखरा ही एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.











































































