कोल्हापूर ।
महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक,राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले.ते ९३ वर्षांचे होते.त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रा. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.
एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे.ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती.
एन.डी. पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते.सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) शेतकरी कुटुंबात 15 जुलै 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र)चे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले होते. त्यांनी एल.एल.बी. देखील केले होते. एन.डी. पाटील यांनी 1954-1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून त्यांनी काम केले. 1960 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून काम केले. शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था,दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. शेकापमध्ये एन.डी. पाटील यांनी काम केले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी काम केले.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कारकीर्द
शेतकरी कामगार पक्षात प्रवेश (१९४८)
मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस (१९५७)
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य- १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ ( १८ वर्षे)
शेकापचे सरचिटणीस – १९६९- १९७८, १९८५ – २०१०
सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य -(१९७८-१९८०)
महाराष्ट्र विधानसभा सदस्य -१९८५-१९९०- (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार -१९९९-२००२
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार
- भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
- स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
- विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
- शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन
समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )