दरवर्षी साडेचार ते पाच हजार दिवाळी अंक होतात प्रकाशित
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या साहित्य संस्कृतीचे अंग असलेल्या दिवाळी अंकानी आता डिजिटल अंक देखील सुरू आहेत. दरवर्षी साडेचार ते पाच हजार दिवाळी अंक प्रकाशित होतात. दिवाळी अंकांच्या आपल्या परंपरेचे यंदा 113 वे वर्ष. लेखकांना निर्मितीची प्रेरणा आणि वाचक अभिरुची घडवणे या माध्यमातून दिवाळी अंक आपले सांस्कृतिक संचित बनले आहे.
मराठीत पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’ प्रकाशित करण्याचा मान काशीनाथ रघुनाथ आजगावकर म्हणजे का. र. मित्र यांचा. 1909 ला त्यांनी हा अंक प्रकाशित केला बंगालमध्ये दुर्गा पूजेनिमित्त निघणारे विशेषांक, गुजराती अंक आणि नाताळ निमित्त निघणारी टाइम्सची लिटररी सप्लिमेंट यापासून का.र.मित्र यांनी प्रेरणा घेतली. बंगाली भाषेच्या प्रेमामुळे त्यांनी मित्र हे नाव घेतले. ‘मजाह’ या गुजराती अंकावरून ते मौज नाव देणार होते. पण नंतर मनोरंजन हे नाव ठरले. का.र.मित्र यांच्यापुर्वी 1905 ला बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या मित्रोदय मासिकाने नोव्हेंबर दिवाळी प्रीत्यर्थ असा 24 पानी अंक काढला होता. या अंकात 16 पाने मराठीत तर 8 पाने इंग्रजीत होती. या अंकात कादंबरी चरित्र, वैचारिक मजकूर होता. वा. गो.आपटे यांच्या संपादनाखाली प्रकाशित आनंद मासिकाच्या 1907 आणि 1908 च्या ऑक्टोबर दिवाळी अंकातून दिवाळी निमित्त विशेष लेख प्रकाशित झाले होते.
अर्थात पहिल्या परिपूर्ण दिवाळी अंकाचा मान, मासिक मनोरंजनचा. का.र.मित्र हे धडपडे संपादक होते. महाराष्ट्र, देश, केपटाऊन, टोकियो येथे त्यांच्या अंकाचे वीस हजार वर्गणीदार होते. मराठीत पहिल्या प्रथमचे सचित्र, मनोरंजक आणि अती स्वस्त मासिक, पुस्तक अशी जाहीरात ते करत. वाचकांनी मातृभाषेत लेखन करावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी प्रादेशिक भाषांतील वाचकांची पत्रे छापली. मनोरंजनाच्या पहिल्या दिवाळी अंकाची किंमत 1 रुपया होती. वर्गणीदारांना भेटीदाखल हा अंक फुकट देण्यात आला. जाहिरातींचे दर सहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत होते. मनोरंजनाचा पहिला दिवाळी अंक 207 पानांचा होता. या अंकात 129 जाहिराती होत्या. मनोरंजनाच्या या पहिल्या दिवाळी अंकात बालकवींची आनंदी आनंद गडे, चंद्रशेखर यांची कवितारती, वि.सी.गुर्जर यांचे, ‘वधुंची अदलाबदल हे विनोदी प्रहसन होते’. 1910 च्या अंकात राम गणेश गडकरी, बालकवी यांच्यावर लेख होते. 115 मान्यवर विभूतींचे छायाचित्रे, चरित्रे, वधू वरांच्या लग्नाची वयोमर्यादा या विषयांवर परिसंवाद होता. मनोरंजनने 1914 ला वसंत हा अंक सुरू करून गोपाळ गणेश आगरकर, हरी नारायण आपटे, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, केशवसुत यांच्यावर लेख दिले. बंगाल, गुजरातमध्ये देखील दिवाळी अंकांची परंपरा आहे. पण आपल्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.
‘मनोरंजन’ चा दिवाळी अंक 1935 पर्यंत निघत होता. बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे शाम जोशी यांनी 1909 पासून निघालेल्या दिवाळी अंकांचे स्वतंत्र ग्रंथालय चालवण्याचा प्रयत्न केला. दिवाळी अंक ही मराठी लेखकांच्या जडण घडणीची शाळाच होय. पु.लं., व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील असे अनेक मान्यवर दिवाळी अंकात लिहीत. रॉय किणीकरांनी लहान मुलांसाठी हाताच्या पंज्याच्या आकाराचा दिवाळी अंक काढला होता. ‘आवाज’ या विनोदी दिवाळी अंकावर बाळासाहेब ठाकरे यांनी सलग तीन वर्षे व्यंगचित्र काढले होते. 112 वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या दिवाळी अंकानी आता प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत. दिवाळी अंकांच्या निमित्ताने दरवर्षी लाखभर पानांचा मजकूर छापला जातो. काही अंक जाहीराती पुरतेच अस्तित्व टिकवून आहेत. तर दर्जेदार, वैचारिक, प्रबोधनपर काम करणारे अनेक दिवाळी अंक वैचारिक पुस्तकांप्रमानेच उपेक्षित रहात आहेत. तरीही महाराष्ट्र आणि दिवाळी अंक ही आपली परंपरा देशात एकमेव आहे याचा मराठी माणसाला अभिमान आहे.