शाळा-कॉलेजात शिकलेला तरुण, डोक्यावर जोश, डोळ्यांत स्वप्नं… आणि अचानक एखाद्या पक्षाच्या झेंड्याखाली उभा राहतो. सुरू होते ती एका “नेत्याचा/पुढाऱ्याचा” म्हणून ओळख मिळवण्याची धडपड. पोस्टर लावणं, सभा-मेळ्यांच्या कामात रात्रंदिवस झिजणं, सभा झाल्यावर खुर्च्या आणि सतरंज्या उचलणं हेच त्याचं राजकारण बनून जातं.
पण… पुढे काय?
किती जणांना आज खरंच राजकारणात संधी मिळते?
किती जणांची नावं यादीत घेतली जातात?
किती जणांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं?
बहुतेक तरुणांना मिळते ते एकच उत्तर “थांब, वेळ येईल!”
आणि ही वेळ कधीच येत नाही. ‘भविष्यात बघू’ म्हणणारे नेते तुमचा वेळ आणि आयुष्य दोन्ही घेतात.
दुसरीकडे नेत्यांची मुलं परदेशी शिक्षण घेतात, उद्योग टाकतात, थेट मोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी बनतात. आणि तोच कार्यकर्ता, जो पाच वर्षे झिजला, त्याला भेटते ती एका पुढाऱ्याच्या ओळखीने मिळालेली कंत्राटी नोकरी. तीही ८-१० हजार पगाराची, कोणतीही स्थिरता नाही, काहीही भविष्य नाही. दोन-दोन वर्षे मागे लागून मिळालेली कंत्राटी नोकरी – तीही दोन-चार वर्षे टिकेल की नाही, याची खात्री नाही. सत्तेत बदल झाला की पहिल्यांदा नावं कापली जातात ती अशा कार्यकर्त्यांचीच. कामासाठी झटणाऱ्या हातात नेतृत्वाच्या संधी येण्याऐवजी, उरतात त्या सतरंज्या आणि खुर्च्या उचलायच्या जबाबदाऱ्या.
हीच खरी लाजिरवाणी बाजू आहे सध्याच्या राजकारणाची.
“नेत्यांच्या मुलांना मिळतात उद्योग, चांगल्या नोकऱ्या… आणि कार्यकर्त्यांना मिळतात पोस्टर, झेंडे, आणि कंत्राटी नोकर्या.”
आज ‘राजकारण’ हे एखाद्या मिशनसारखं उरलेलं नाही, ते फक्त विशिष्ट लोकांचा “प्रिव्हिलेज” झाला आहे. कार्यकर्ते म्हणजे केवळ वापरायचं माध्यम. निवडणुकीपुरते उपयोगी, निवडून आल्यानंतर विसरले जाणारे.
गेल्या पन्नास वर्षांत अनेकवेळा सत्तेच्या खुर्च्या बदलल्या. पण कार्यकर्त्याचं नशिब मात्र तिथंच अडकलं. आजही अनेक तरुण, शिक्षण घेऊन राजकारणाच्या झगमगाटाला भुलतात. नेत्यांच्या पायाशी झुकून ते ‘भावी नेता’ होण्याची स्वप्नं पाहतात. पण वास्तव काही वेगळंच आहे.
विचार करा, मग उडी घ्या!
युवकांनो, आज सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट, पुढाऱ्यांचे सेल्फी, आणि मंचावरील भाषणं पाहून प्रभावित होण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा “हेच का आपलं स्वप्न?”
तुमच्याकडे शिकण्याची संधी आहे, तंत्रज्ञान आहे, उद्योजक होण्याची क्षमता आहे, समाजाला काहीतरी देण्याची उमेद आहे. मग स्वतःला एखाद्या नेत्याच्या चरणाशी बांधून का घ्यावं?
राजकारणात या देशाला खऱ्या नेतृत्वाची गरज आहे. पण ते नेतृत्व केवळ सतरंज्या उचलणाऱ्यांतून येणार नाही, तर विचार करणाऱ्यांतून, प्रश्न विचारणाऱ्यांतून आणि बदल घडवणाऱ्यांतून येईल.
आज कार्यकर्ता सजग झालाच पाहिजे. आपला वेळ, आपली उर्जा, आणि आपली बुद्धी सत्ताधाऱ्यांच्या भांडणात जळायला नको. राजकारणाचा भाग व्हा, पण गुलाम नाही.
युवकांनो, सतरंज्या उचलणं थांबवा आणि आपल्या जीवनाचा खरा नेता स्वतः बना!