सांगली । जिल्ह्यात सुरु असलेली अवैध गौणखनिज वाहतूक रोखण्यासाठी मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदारांना दिले आहेत.जिल्हयामध्ये गौणखनिज अवैध उत्खनन व वाहतूकीच्या वारंवार होत असलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सांगली, तासगाव, मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ व जत येथील तहसीलदारांनी संबंधित क्षेत्रात स्थिर पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पथकात एक मंडल अधिकारी, दोन तलाठी व पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. ही स्थिर पथके 1) अंकली फाटा, 2) कुमठे फाटा, 3) पाचवा मैल, 4) म्हैसाळ फाटा, 5) सुभाषनगर, 6) वाघवाडी फाटा-शिराळा फाटा, 7) कवठेमहाकाळ फाटा, 8) मुचंडी, 9) दिघंची ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.
या स्थिर पथकांनी गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यांचे वाहतूक पास पडताळणी करावी व त्याचे व्हिडिओ स्वरूपात चित्रीकरण करावे, सांगली, तासगाव, मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ तहसिलदार वगळता इतर सर्व तहसिलदार यांनी आपल्या तालुक्यातील शहरांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील मोक्याच्या ठिकाणी स्थिर पथके स्थापन करावीत. संबंधित स्थिर पथकांनी गोणखनिजाची वाहतूक तपासणी करून आवश्यक कारवाई करावी असे आदेशात म्हटले आहे.
तहसिल स्तरावर फिरती पथक तयार करणे
प्रत्येक तहसिलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात फिरती पथक गठीत करावेत, या पथकात नायव तहसिलदार, मंडल अधिकारी, दोन तलाठी व पोलीस कर्मचारी यांचा समावेश असावा. तसेच सदर पथक हे तालुक्यातील विविध ठिकाणी अचानक भेटी देऊन अवैध गौणखनिज उत्खननाच्या ठिकाणाची व अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करेल व आवश्यक कारवाई करेल.
उपविभागीय अधिकारी स्तरावर फिरती पथक तयार करणे
प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र फिरती पथक तयार करावे, या पथकात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, दोन तलाठी व पोलीस कर्मचारी आवश्यकतेनुसार अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असावा, सदर पथक हे संपूर्ण उपविभागात नियमितपणे गस्त घालून अनधिकृत गौणखनिज उत्खननाच्या ठिकाणाची व अवैध वाहतुकीवर नजर ठेवेल व तात्काळ कारवाई करेल.
वरील कार्यवाहीस तत्काळ अंमलबजावणी करावी. सदरील आदेशाची कडक अंमलबजावणी करून पाक्षिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा असेही शेवटी आदेशात म्हटले आहे.