भारतीय राजकारणात पक्षांतर काही नवीन नाही, पण सध्या ज्या प्रमाणात नेते एका पक्षातून दुसऱ्यात उड्या मारत आहेत, ते पाहता हे ‘फेरीपटू राजकारण’ नव्या उंचीवर पोहोचले आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत विचारधारा, पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी संघर्ष या संकल्पना महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मात्र, आजच्या राजकारणात सत्ता आणि स्वार्थ महत्त्वाचे झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आणि सत्ता बदलाच्या काळात अनेक राजकीय ‘फेरीपटू’ पक्ष बदलताना दिसतात.
लोकशाहीत पक्ष बदलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो केवळ स्वतःच्या फायद्यासाठी केला जातो की खरोखरच्या विचारधारेत बदल झाल्यामुळे? हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. अनेकदा सत्ता मिळवण्यासाठी, चौकशांपासून सुटका मिळवण्यासाठी किंवा मंत्रिपदाची संधी मिळवण्यासाठी नेते पक्ष सोडतात. लोकांसाठी राजकारण करणारे नेते पक्षांतर करताना फारसे दिसत नाहीत.
एका पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे कार्यकर्ते जेव्हा त्यांचा नेता अचानक दुसऱ्या पक्षात जातो, तेव्हा त्यांची फसवणूक होते. सामान्य मतदारांनाही अशा नेत्यांमुळे संभ्रम वाटतो. कालपर्यंत ज्या पक्षाच्या विचारसरणीवर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश केल्यावर अचानक तीच विचारसरणी योग्य वाटू लागते. मग नेत्यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांचे काय? यावर जनता ‘थर्ड अंपायर’ बनून विचार करत आहे.
मतदार कोणत्या नेत्याला स्वीकारतो आणि कोणाला नाकारतो, हे अंतिमतः निवडणुकीत ठरते. मात्र, अशा ‘फेरीपटू’ राजकारण्यांच्या बढत्या पाहिल्यावर जनता आणि कार्यकर्त्यांनाही कधी कधी असं वाटतं—खरंच, लोकशाहीत निष्ठा आणि तत्त्वनिष्ठा नामशेष होत आहेत का?
हेही वाचा – थर्ड अंपायर : सत्तेचा खेळ आणि जनता
राजकीय फेरीपटूंना लोकशाहीच्या ‘थर्ड अंपायर’ने म्हणजेच मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे. असे लोकशाहीचे खेळाडू टिकणार की बाद होणार? ही खरी कसोटी आहे!
क्रिकेटमध्ये तिसरा अंपायर योग्य निर्णय देतो, पण राजकारणात कोणत्याही ‘फेरीपटू’वर कारवाई होत नाही. जर जनता थर्ड अंपायर बनून योग्य निर्णय घेत नसेल, तर हे राजकीय नाटक असंच सुरू राहणार!
– थर्ड अंपायर
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई । नैसर्गिक वाळूच्या अती उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृ... Read more