पुणे । विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून या संमेलनातून जागतिक प्रेमाची आणि मानवतेची बांधणी होईल तसेच जगातील अनेक देशातील साहित्य व संस्कृती यांचा मिलाफ होऊन जागतिक मैत्रीचा प्रसार सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल असे प्रतिपादन २६ व्या अक्षरयात्री भारत श्रीलंका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इरोशनी गलहेना यांनी केले.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे व डॉ. स्वाती शिंदे – पवार यांच्यामुळे दोन देशातील साहित्यिकांच्या विचारांचे आदान -प्रदान आज होत आहे. सबुद्धी प्रतिष्ठान, श्रीलंका सरकार, अनेक विद्यापीठांचे विभाग प्रमुख यांच्यासह आम्ही केलेली ही भारताची सांस्कृतिक पहाणी फारच आनंददायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या अरुमुगम निरोमी यांनी भारत – श्रीलंका साहित्यिकांचे एकत्रित येणे प्रेरणादायी असून भारतीय स्त्रिया खूप धाडसी असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील स्त्रियांची एकजूट आणि त्यांचे साहित्यातील योगदान महत्वपूर्ण असण्याची नोंद त्यांनी घेतली.
उद्घाटक प्रा .मिलिंद जोशी म्हणाले की, अक्षरयात्री प्रतिष्ठान आणि विश्व साहित्य संस्कृती चळवळ यांच्यामुळे पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये हे संमेलन भरते आहे याचा मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा डॉ .स्वाती शिंदे – पवार या नावाचा उल्लेख करावाच लागेल. या साहित्य संमेलनाने भारतीय साहित्य आणि संस्कृतीचा जागर जागतिक स्तरावर केला आहे.
स्वागताध्यक्षा सुनिता राजे पवार यांनी श्रीलंकेहून आलेल्या टीमचे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, अक्षरयात्रीची साहित्य संमेलने मी पाहिली आहेत. या संमेलनातून ओसंडून वाहणारा उत्साह मी अनुभवला आहे.स्त्री शक्तीचे उत्तम दर्शन हे संमेलन घडविते. या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील ऐंशी साहित्यिकांनी हजेरी लावली होती.
मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून सुरू झालेली अक्षरयात्री साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातून आता विश्व साहित्य संस्कृतीकडे झेपावली आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन गतवर्षी नेपाळ येथील दुतावासामध्ये संपन्न झाले होते. २५ भाषांतील बहुभाषिक मान्यवर साहित्यिकांनी यामध्ये आपल्या सहभाग नोंदविला होता. या संमेलनातील कवी संमेलनअध्यक्ष पद मृणालिनी कानेटकर यांनी भूषविले. चिंतक रानसिंह श्रीलंका येथील केरानी विद्यापीठाचे सिन्हाल विभाग प्रमुख यांनी “श्रीलंकन कविता व तिची वैशिष्ट्ये” या विषयावर शब्दसंवाद साधला. यावेळी निमंत्रित मान्यवरांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये श्रीलंकेतील ११ व भारतातील २१ मान्यवर कवी सहभागी झाले. सिंहली भाषेतील कवितेचे इंग्रजी भाषांतर यावेळी श्रीलंकेतील साहित्यिकांनी सादर केले. भारतीय भाषेत या कवितेचा अनुवाद केला जाईल. भारतीय भाषेतील मराठी कविता इंग्रजी व सिंहली भाषेत भाषांतरित करून ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली जाईल, असे यावेळी डॉ. स्वाती शिंदे – पवार व डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.
या संमेलनासाठी बालिका ज्ञानदेव दहिवडी, आशा खरतडे – डांगे छत्रपती संभाजीनगर,डॉ. अमरसिरी विक्रमारात्ने भाषा विभाग प्रमुख, कला आणि संस्कृती, दक्षिण पूर्व विद्यापीठ श्रीलंका, डॉ. प्रदीप गुणसेना इंग्रजी विभाग प्रमुख बौद्ध आणि पाली विद्यापीठ श्रीलंका, प्रा .डॉ. प्रीती शिंदे – पाटील वारणानगर, चिंतक रानसिंह सिन्हाल विभाग, केरानी विद्यापीठ, श्रीलंका, प्रियांत बंदारा नॅशनल कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीलंका, राहुल काळे राजेवाडी, प्रा.डॉ. गिरिजा शिंदे सातारा, उपुल गुरुगे संपादक श्रीलंका, अस्मिता चांदणे पुणे, थमिरा मंजू संस्थापक सबुद्धी संघटना श्रीलंका, डॉ .स्मिता पाटील मोहोळ, कविता करंजकर- जमाले धाराशिव, डॉ. प्रसाद पिटिगलआराच्ची, सर्जन, कँडी, श्रीलंका, जोत्स्ना चांदुगडे पुणे, अंजली ढमाळ सातारा, थुशान निसानसन वरिष्ठ कार्यकारी, सब्बुद्धी संघटना, श्रीलंका प्रा. डॉ. विलास पाटील जिंतूर, सांदुन जयवर्धन वन्यजीव छायाचित्रकार श्रीलंका, निसर्गाराजे शिंदे जेजुरी, अपर्णा पाटील,कोल्हापूर, प्रा.डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन, दत्ता केंजळे, पुणे, धनश्री पाटील, सातारा हे मान्यवर उपस्थित होते.