सांगली । आपल्या देशात लोकशाहीचा गळा दाबला जात असून देशात धार्मिक,जातीय द्वेष वाढविला जात आहे.सध्या देशासमोरील बेकारी,महागाई,गरीबी आदी प्रश्न बाजूला पडणे,दुर्दैवी आहे.देशातील लोकशाही टिकविण्यात,सामान्य माणसांचे अधिकार अबाधित ठेवण्यात पत्रकारांची भूमिका मोलाची असल्याचे मत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.आपल्या इथपर्यंतच्या राजकीय प्रवासात पत्रकारांचे योगदान मोठे असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
इस्लामपूर येथे आविष्कार कल्चरल ग्रुप व वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने वाळवा तालुक्यासह मिरज तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर,लोक नेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रा. संजय थोरात,विश्वास धस,आविष्कारचे अध्यक्ष सुनिल चव्हाण,सचिव विश्वनाथ पाटसुते,पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद मोहिते,प्रा.प्रदीप पाटील,भूषण शहा, प्रा.कृष्णा मंडले,दिनेश ऐतवडे,प्रा.अशोक शिंदे,धर्मवीर पाटील,उत्तम कदम,युवराज निकम,विनायक नायकल,सिध्दार्थ कांबळे, सूर्यकांत शिंदे,नितीन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,पत्रकार हे समाज मन तयार करण्याचे महत्वाचे काम करीत आहेत. अलिकडे पत्रकारिता सोपी राहिली नाही. अचूक बातम्या देणे,एक आव्हान बनले आहे. पूर्वीची पत्रकारिता व आताच्या पत्रकारिते मध्ये मोठा फरक आहे. अनेक पत्रकार आदर्श काम असताना सगळे पत्रकार विकले गेले आहेत,असे बोलणे योग्य नाही. देशात प्रथमच सर्व विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले. मात्र त्याविरोधात कुठे आवाज उठताना दिसत नाही,माध्यमात फारशी चर्चा होत नाही. लोकशाहीची जागा झुंडशाहीने घेणे देशासाठी धोकादायक आहे.आमच्याकडे बहुमत आहे म्हणजे आमचेच राज्य अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता बनली आहे.
यावेळी प्रा.संजय थोरात,विनोद मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वास धस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आदर्श पत्रकार पुरस्कार विजेते युनूस शेख,धनंजय बामणे,संदीप परीट,संदीप डोंगरे यांच्यासह १२५ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी आविष्कारचे उपाध्यक्ष भूषण शहा यांनी स्वागत,तर सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी प्रास्ताविक केले. माजी सहसचिव प्रा.कृष्णा मंडले यांनी सूत्रसंचालन केले. युवा सदस्य सौरभ सावंत यांनी आभार मानले.
याप्रसंगी अर्जुन पाटील,डी.बी.पाटील, सतिश पाटील,डॉ.अतुल मोरे,विजय लाड, सचिन पाटील,राजेंद्र माळी,विकास कोरे, शांताराम पाटील,धन्वंतरी परदेशी,दिलीप क्षिरसागर,अवधूत कुलकर्णी,विठ्ठल दळवी, विजय शिंदे,संतोष पाटील,यांच्यासह सर्व दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.