नवी दिल्ली | नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडेल.या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) योजनेच्या 24 लाभार्थ्यांना नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘लोकसहभागा’च्या संकल्पनेला अनुसरून, केंद्र सरकारने देशभरातून, समाजाच्या विविध घटकांतील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीत आलेल्या विशेष पाहुण्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारक तसेच पंतप्रधान संग्रहालय या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
एफपीओचे 24 लाभार्थी समारंभाला उपस्थित राहणार
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणीमधील धाडगाव येथे राहणारे लालसिंग वन्या वळवी राजधानी दिल्ली आणि लाल किल्ल्याला प्रथमच भेट देण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिन सोहोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. सरकारने त्यांच्या एफपीओचे कार्य ओळखून त्यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यासाठी आमंत्रित केल्यामुळे वळवी अत्यंत आनंदित झाले आहेत. नाबार्डच्या मदतीने स्थापन झालेल्या त्यांच्या ‘आमु आखा एक से’ या एफपीओने 200 ते 300 एकर क्षेत्रावर सेंद्रिय आंबा,कोकम, भरड धान्ये आणि तुरडाळ यांचे पीक घेतले आहे. त्यांच्या गावातील दीडशेहून अधिक कुटुंबे या एफपीओमध्ये कार्यरत आहेत.
सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे उत्तमराव कृष्णा देसाई हे देखील यावर्षीचे विशेष निमंत्रित आहेत. ते पाटण तालुका शेतकरी उत्पादक कंपनी या एफपीओचे अध्यक्ष असून एप्रिल 2021 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे 300 सदस्य आहेत. त्यांची कंपनी इंद्रायणी जातीच्या तांदळासह इतर अनेक दर्जेदार बियाणांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांना या बियाणांची विक्री करते. यापुढे त्यांनी आपल्या व्यवसायात वैविध्य आणण्याची योजना आखली असून ते आता शेतकऱ्यांना कमी किमतीत शेतीची अवजारे आणि ट्रॅक्टर्स यांची विक्री सुरु करणार आहेत.
उत्तमराव कृष्णा देसाई यांच्या एफपीओतर्फे होत असलेली बियाणे विक्री
एफपीओ सदस्यांसह उत्तमराव कृष्णा देसाई
कृषी मालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करणे ही शेतकरी उत्पादक संघटनांच्या स्थापनेमागील संकल्पना आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभतेने होण्यासाठी, केंद्रीय कृषी आणि सहकार विभागाने छोट्या शेतकऱ्यांच्या कृषीव्यवसाय संस्थेच्या स्थापनेचा नियम केला जेणेकरून शेतकरी उत्पादक संघटनेच्या स्थापनेसाठी राज्य सरकारांना पाठबळ मिळेल.
शेतीसाठी लागणारे घटक ते हाती आलेले पीक अशा प्रत्येक कार्यात सदस्य शेतकऱ्यांसाठी संघटक म्हणून काम करणे ही एफपीओची जबाबदारी आहे. संघटनेच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणातील कार्यातून होणारी काटकसर तसेच सदस्य शेतकऱ्यांची वाटाघाटीची क्षमता यामध्ये सुधारणा होते.
समाजाच्या विविध स्तरातील विशेष अतिथींना निमंत्रण
महाराष्ट्रातील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे चार लाभार्थी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. या योजनेच्या 50 लाभार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसोबत 1800 व्यक्तींमध्ये समावेश आहे ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून होणारे भाषण ऐकण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.देशभरातील समाजाच्या विविध स्तरातील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्याचा हा उपक्रम सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून आहे.
या विशेष निमंत्रितांपैकी एक असलेले अक्षय ऊईके हे गडचिरोली जिल्ह्यातील चटगावचे रहिवासी आहेत. बांबूच्या पारंपरिक वस्तूंची विक्री करण्याचा त्यांचा एक घरगुती व्यवसाय असून यामधून त्यांना दिवसाला 300 रुपये उत्पन्न मिळते. ऊईके यांनी सरकारच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की नवी दिल्लीमध्ये होत असलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे. हे निमंत्रण दिल्याबद्दल आपण अतिशय आनंदित झालो असून याबद्दल पंतप्रधानांचे, त्याबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नागपूरचे विकास आणि सुविधा कार्यालय यांचे ऋणी आहोत, असे ऊईके यांनी सांगितले.
‘अक्षय ऊईके बांबूच्या वस्तू तयार करत आहेत.’
एमएसएमई मंत्रालयाचे आणखी एक विशेष निमंत्रित शुभम सातपुते महाराष्ट्रामधील कोल्हापूरचे असून त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, “ एमएसएमई विभागाने सुरू केलेल्या, चेन्नईच्या प्रतिष्ठेच्या सेंट्रल फूटवेअऱ ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या बहुमूल्य अभ्यासक्रमाचे आपण प्रशिक्षण घेतले आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरी चपलांविषयीच्या माझ्या दृष्टीकोनामध्ये बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मेमरी फोम्स, आकर्षक रंग आणि घसरण्याला प्रतिबंध करणारे पायताण तळ यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करून मी कोल्हापुरी चपलांचा प्राचीन वारसा कायम राखत पारंपरिक कारागिरीला आधुनिकतेची आणि आकर्षकतेची जोड दिली आहे.”
शुभम सातपुते, कोल्हापुरी चपला तयार करताना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशातील उद्यमशील युवा वर्गात कौशल्याचा विकास करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.
निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रातील तीन मच्छीमारांचा समावेश
या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 50 मच्छिमारांपैकी तीन मच्छीमार महाराष्ट्रातील आहेत. विशेष निमंत्रितांपैकी एक असलेले तुकाराम वानखेडे, जे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील नेवपूरचे आहेत आणि गोड्या पाण्यात मासेमारी करतात, ते नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाल्याने अत्यानंदात आहेत. “माझ्यासारखा सामान्य माणूस विमानाने प्रवास करून दिल्लीला जाणार आणि विशेष आदरातिथ्याचा मानकरी ठरणार, माझ्यासाठी हा अत्यंत गौरवास्पद क्षण आहे”, अशी प्रतिक्रिया तुकाराम वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांसारखी महत्त्वाची व्यक्ती देशातील गरीबातील गरीब माणसापर्यंत कशी पोहोचते, यांचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे सांगत त्यांनी आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राजेंद्र शांताराम मेहेरे नावाच्या आणखी एका मच्छीमार बांधवाला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. “सरकारने केंद्रात एक स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालय निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे मच्छीमारांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत, तसेच किसान क्रेडिट कार्डाचा मत्स्यपालन व्यवसायात विस्तारित वापर यासह मत्स्यसंवर्धन, विविध मत्स्य प्रजातींचे रक्षण, सागरी पर्यावरण आणि इतर गोष्टींचा मत्स्य व्यवसाय क्षेत्राला खूप फायदा झाला आहे, अशा शब्दात राजेंद्र मेहरे यांनी आपला आनंद व्यक्त केला. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होत आहे.” असेही ते म्हणाले.