पुणे । मुंबईचा फौजदार,देऊळ बंद,पानीपत आदी चित्रपटातील अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते,देखणा आणि रुबाबदार नट रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे.77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पुण्यातील मावळ तालुक्यातील आंबे येथे त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते.आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कलावंत गमावल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.
सात ते आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी एकटेच राहायला होते अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडल्यानंतर घरात त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी,सून आणि नातू असा परिवार आहे.गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.
‘मुंबईचा फौजदार’मधून घराघरात पोहोचले महाजनी
रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले.रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती.देखणेपण,रुबाबदार,दमदार अभिनय या जोरावर अभिनेते महाजनी यांनी 1975 ते 1990 चा काळ त्यांनी गाजवला.
मूळ बेळगाव येथे जन्मलेले रवींद्र महाजनी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती.त्यांनी अभिनयातच कारकिर्द करण्याचं निश्चित केलं होतं. महाविद्यालयीन जीवनात त्यांची अनेक कलाकार आणि निर्मात्यांशी ओळख झाली. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले.शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला.
त्यानंतर ‘आराम हराम आहे’,’लक्ष्मी’,’लक्ष्मीची पावलं’,’देवता’, अशा अनेक यशस्वी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आणि चित्रपटही हिट झाले.’गोंधळात गोंधळ’,’मुंबईचा फौजदार’ अशा गाजलेल्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या.1990 नंतर त्यांनी आपला रोख चरित्र भूमिकांकडे वळवला होता.’सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला.2015 नंतर त्यांनी ‘काय राव तुम्ही’,’कॅरी ऑन मराठा’,’देऊळ बंद’,’पानीपत’ अशा चित्रपटांमध्ये ते झळकले होते.
‘मुंबईचा फौजदार’ एकेकाळी होता टॅक्सी चालक
अभिनेते रविंद्र महाजनी यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.पण या क्षेत्रात आपण कधी येवढे नाव कमवू याचा त्यांनी कधीच विचारही केला नव्हता.पण त्यांना अभिनय करायला खूप आवडायचा.सुरुवातीच्या काळात पोटापाण्यासाठी ते मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायचे. जवळपास 3 वर्षे त्यांनी टॅक्सी चालक म्हणून काम केले.आपले नशीब आजमवण्यासाठी दिवसा ते वेगवेगळ्या निर्मात्यांची भेट घ्यायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे.महाजनी यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना टोमणे ऐकावे लागले.पण गरजेसमोर पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी हे टोमणेही सहन केले..