आकलन, वाणी आणि लेखणी या संभाषण कौशल्याच्या महत्वाच्या बाजू आहेत.आपल्याकडे असे म्हटले जाते,बोलणाऱ्यांचे ‘कुळीथ विकले जाते,पण न बोलणाऱ्यांचे गहू विकले जात नाहीत’ याच उक्तीप्रमाणे वकृत्व कलेला प्राचीन काळापासून अद्वितीय असे महत्व राहिले आहे.आपल्या ओघवत्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळेच स्व.गोपीनाथ मुंडे,स्व.विलासराव देशमुख व स्व.प्रमोद महाजन तर आजच्या काळात प्रा. नामदेव जाधव,विश्वास नांगरे पाटील, डॉ. विठ्ठलराव लहाने,विवेक घळसासी व नितीन बानगुडे पाटील अशा अनेक दिग्गजांची सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.आवाज, बुद्धीमत्ता ह्या दोन बाबी सर्वांकडेच असतात.मात्र अचानक कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐनवेळी एखाद्याने बोला,म्हटले की मी- मी म्हणणाऱ्यांची बत्ती गुल होते.अशा वेळी मला वक्तृत्व हे पुस्तक सुचवावे वाटते.
‘ओले मूळ भेदी खडकांचे अंग I अभ्यासाशी संग कार्य सिद्धी’
आजच्या आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या गतिमान काळात तर वक्तृत्व हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.कार्पोरेट असो की सामाजिक, राजकीय,औद्योगिक व सांस्कृतिक अशा कोणत्याही क्षेत्रात काम करा,बोलण्याचा प्रसंग हा येतच असतो.वक्तृत्व कुणाची मक्तेदारी नाही,तर ती निश्चितच प्रयत्न साध्य गोष्ट आहे.सतत वाचन,चिंतन, मनन,आकलन,संस्कार,सराव,प्रशिक्षण,अभ्यासाच्या जोरावर व अनुभवसंपन्नतेवर आपण वक्ता म्हणून स्वतःला विकसित करू शकतो.चांगलं बोलण्यासाठी केवळ शाळा-महाविद्यालयातलं शिक्षण आवश्यक आहे,असं काहीही नाही.चारभिंतीबाहेरील जीवनाच्या शाळेत सुद्धा वक्तृत्व कला आत्मसात करता येते. म्हणजेच ‘वक्ते जन्माला येत नाहीत, तर घडवावे लागतात’.हाच दृष्टीकोन मनी बाळगून प्रा.डॉ.संजय थोरात यांनी वक्तृत्व या पुस्तकाचे लेखन केले आहे. वाचणाऱ्या,लिहिणाऱ्या, बोलणाऱ्यापासून ते ऐकणाऱ्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक ऊर्जा स्रोत आहे. वाचन,अनुभव व पूर्वतयारीने वक्तृत्व सुधारते,हा मूलमंत्र देणारे हे पुस्तक आहे.सभाधीटपणा, वाचन व देहबोली विकसित करण्यासाठी हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा ‘अमृतकुंभच’ आहे.
आमचे मार्गदर्शक प्रा.डॉ संजय थोरात एक उत्तम लेखक,पत्रकार आणि प्राध्यापक असून ते अमोघ वक्तृत्व अखंड गुणसंपन्नतेचे धनी आहेत.वक्तृत्व स्पर्धेतील यश,भाष्यकार,नंतर निःपक्षपाती परिक्षक,पत्रकार म्हणून उत्तम भूमिका बजावताना ओघवती भाषाशैली आणि असंख्य भाषणांचे श्रवण यामुळे वक्तृत्वाची सामर्थ्यस्थळे,उणिवा यासर्व गोष्टीचे ते जाणकार असल्याने त्यांना विषयाचे मर्म सापडले आहे.अनेकदा आरडून, ओरडून, घाम फुटेपर्यंत व गतीने केलेले भाषण हेच श्रोत्यांना भुरळ घालते.परंतु त्यातून कोणता विचार मिळाला, हे सांगताना श्रोत्यांना निश्चित सांगता येत नाही. माळरानावर पडलेल्या पावसातून जसा पाझर झिरपत नाही,तसा विचार वरील भाषणातून मिळत नाही.बोलणाऱ्यांची संख्या पुष्कळ व गुणवत्तेचा वाणवा हा सार्वत्रिक अनुभव आहे समाज हा अनेक रंगीबेरंगी वक्त्यांनी गजबजलेला आहे.त्यातील धवल रंग टिपण्याचे तंत्र शोधून देणारे हे पुस्तक आहे.
“आंम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने I शब्दांचीच शस्त्रे यत्न करू
शब्दे वाटू धन जनलोका II तुका *म्हणे पहा शब्दचि हा देव शब्दचि गौरव पूजा करू II”
या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी या पुस्तकात सर्व बाबी मुद्देसूद, प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे मांडल्या आहेत. वक्तृवाचा इतिहास, मौखिक परंपरा,वक्त्यांची मांदियाळी,नामवंत वक्ते,समकालीन वक्ते,व्यासपीठ संस्कृती,वक्तृत्वाचे महत्व, सादरीकरण, प्रभावी भाषण, भाषण रंग,श्रोते आणि समारोप इ. प्रकरणाद्वारे वक्तृत्वाचा विषय मुद्देसूदपणे मांडला आहे. ऐतिहासिक काळातील वक्त्यापासून ते अलीकडच्या काळातील वक्ते व त्यांचे वेगळेपण यासर्व बाबी त्यांनी उत्कृष्ट पध्दतीने विशद केल्या आहेत.
प्रास्ताविक करणारे, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, आभार व्यक्त करणारे सूत्रसंचालन करणारे यांनी बोलताना खरोखरच आत्मभान बाळगले पाहिजे, मुद्देसूद व कमी बोलले पाहिजे, अन्यथा हे व्यासपीठाचे शत्रू बनतील, हे प्रा.डॉ.संजय थोरात यांनी स्पष्टपणे व सडेतोडपणे तंत्र सांगितले आहे. पोपटपंची करणाऱ्या वक्त्यापेक्षा समाजोपयोगी पडणाऱ्या वक्त्यांची आज गरज आहे. वरील सर्वांच्या बोलण्याचा आशय व कालावधी किती असावा, समारंभ अध्यक्ष निवडीचे निकष याबाबतची अनेक मार्गदर्शक तत्वे या पुस्तकात आहेत.
वरील व्यक्तींच्या बाबतीत लेखन करण्याचा उद्देश दोष दिग्दर्शन नसून व्यासपीठ शत्रूंचे व्यासपीठ मित्रांत रूपांतर करुन नवीन व्यासपीठ संस्कृती निर्माण करणे हा आहे. याचाच अर्थ आपले बोलणे खरे आणि मृदू असावे. कमी व रसाळ असावे जणू अमृत वाणीमधून बाहेर पडायला हवे.कारण बोलण्यामुळे रामायण घडले, महाभारत घडले. वादग्रस्त वक्तव्ये, विधाने टाळून अभ्यासपूर्ण विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत,हे सारं/सारांश या पुस्तकातून सांगितले आहे.कीर्तन व तमाशा या लोकपरंपरा व लोकसंस्कृती इत्यादींचे महत्व व त्यांचा वक्तृत्वाशी अनन्यसाधारण संबंध या पुस्तकात विशद केला आहे. प्रा.डॉ. संजय थोरात यांनी साहित्यिकांच्या लेखनाचे संदर्भ देऊन वक्तृत्वाचा विषय तळमळीने मांडला आहे.पुस्तक वाचताना अनेक ग्रंथ व पुस्तकांचे, मुद्रित भाषणांचे संदर्भ व नावे व वक्ते ज्ञात होतात.परिपूर्ण व परिवर्तनाची क्षमता असणारे वक्ते घडविणे हे यासाठी पुस्तक उपयुक्त आहे.पुस्तकात ठिकठिकाणी विनोद,चुटके व प्रसंग,वक्त्यांचे, विचारवंतांचे फोटो यामुळे हे पुस्तक वाचनीय होऊन वाचकाला आपलेसे करते.लेखकांनी जास्त लांब पल्ल्याची,गोंधळात टाकणारी वाक्ये टाळून सोपी व सुटसुटीत वाक्यरचना केली आहे.प्रकरणाच्या दिलेले शेवटी सारांश,ठळक मुद्दे,प्रत्येक पानाच्याखाली सुविचार स्वरूपात दिलेली वाक्ये खूप महत्वपूर्ण आहेत.वक्तृत्वाच्या प्रांतात स्वतःची वाट निर्माण करण्यासाठी व याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या सर्वांच्यासाठी हे पुस्तक अंधारातून चालण्यासाठी मिणमिणती पणती हाती देत आहे.विशेष म्हणजे या पुस्तकाचा विस्तार,पृष्ठसंख्या अगदी योग्य व माफक आहे.त्यामुळे दोन ते तीन बैठकीत हे पुस्तक वाचून पूर्ण होते. वाचनानंतर मूळ विषय वाचकांच्या काळजात ऊर्जेच्या स्वरूपात साठून राहतो.त्यामुळे वक्तृत्वाचे पर्यावरण संतुलित राखण्याची शिकवण मिळते.भाषणासाठी काहीतरी हेतू बाळगणे गरजेचे आहे.आपल्या बोलण्याचं नेमकं प्रयोजन व भूमिका आपणाजवळ असावी,हा विचार या पुस्तकातून मिळतो.
मराठी भाषेत एखादं पुस्तक चालणं हा अपवाद व खंडणं हा नियम बनला आहे.परंतु वक्तृत्व या पुस्तकाने सर्व नियम,दंतकथा मोडित काढतं, सव्वीसाव्या आवृत्तीपर्यत मजल मारली आहे.त्याप्रमाणे चौदा वर्षांत वक्तृत्व कौशल्याचा विचार तळागाळात पोहचविणाऱ्या प्रा.डॉ.संजय थोरात यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे आनंदाची पर्वणी आहे.आजच्या तरुणांना उदयोन्मुख वक्ते,पिढीला हे पुस्तक काळजातील ओलाव्याप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील,हे मात्र निश्चित. खरा मित्र सूर्यासारखा असतो,असे प्रा.ना. सी. फडके यांनी एका लघुनिबंधात म्हटले आहे.आपलं चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल जो सावरतो तोच खरा मित्र. सूर्याच्या सानिध्यात जसे वावगं कृत्य करण्याचे धारिष्ट्य होतं नाही,तसे खऱ्या मित्रांच्या बाबतीत असते.त्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे म्हणजे मूल्यसंस्काराचा दस्ताऐवज म्हणावे लागेल.
खरंतर माणसाला नेहमीच,‘नव ते हवं’ याप्रमाणे वस्त्र आणि शस्त्र हे आपण बदलतं असतो.बदलांमुळे साहित्यास नवे रूप,आकार व सौंदर्य प्राप्त होते. त्यानुसार वक्तृत्व पुस्तकाची नवी आवृत्ती अधिक उत्कृष्ट व देखणी बनली आहे.वर्तमानकाळातील संदर्भ व चौफेर उदाहरणे यामुळे या पुस्तकातील ज्ञानाचा परिघ अधिक व्यापक बनला आहे.खरं तर मी या पुस्तकाच्या बाराव्या आवृत्तीचा वाचक असल्यामुळे मला आज बोलण्याची प्रेरणा मिळाली,वक्ता म्हणून उभं करण्यासाठी या पुस्तकाने बळ दिले आहे,असे मला निर्विवाद सांगावेसे वाटते.
• पुस्तक नाव : वक्तृत्व
• लेखक : प्रा.डॉ.संजय थोरात
• मुखपृष्ठ : आरिफ तांबोळी
• प्रकाशक : प्रतिभा प्रकाशन, इस्लामपूर
• पृष्ठे : 116 किंमत : 125/-
पुस्तकासाठी संपर्क – प्रतिभा बुक्स इस्लामपूर, फोन नंबर – 7588586676
डॉ. दीपक सूर्यवंशी
सहयोगी प्राध्यापक तथा संशोधक मार्गदर्शक
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,
कळंब जि. उस्मानाबाद भ्रमणध्वनी-:7588586676