मुंबई । राज्यात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी-भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात आता ‘हॅलो” ऐवजी “वंदे मातरम्” या अभिवादनाने होणार आहे.
‘वंदे मातरम्’ या शब्दाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे :
वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी सन १८७० या वर्षामध्ये लिहिलेले गीत सन १८९६ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम गायले गेले होते. सन १९०५ ला झालेल्या बंगालच्या फाळणी दरम्यान “वंदे मातरम्’ हा परवलीचा शब्द होता. अनेक क्रांतिकारकांनी या गीताचा उद्घोष करत करतच बलिदान दिले होते. “इन्कलाब जिंदाबाद” व “वंदे मातरम्” या दोन शब्दांनी स्वातंत्र्य चळवळ भारावून गेली होती. या गीतावर व त्याच्या गायनावरही इंग्रजांनी बंदी घातलेली होती. मात्र तत्कालीन राजकीय पक्ष, क्रांतिकारक व सर्वसामान्य नागरिक यांनी ही बंदी झुगारून बंदे मातरम् गाण्यास सुरुवात केली होती. स्वातंत्र्य चळवळीतील धगधगत्या अग्निकुंडात बलिदान देणाऱ्या अनेक वीरांकडून “वंदे मातरम्” हाच उद्घोष करण्यात येत होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हे सर्वमान्य स्फूर्तिगीत होते. दिनांक १४ ऑगस्ट १९४७ रोजी झालेल्या संविधान परिषदेच्या बैठकीची सुरुवातही या गीतानेच झालेली होती. तसेच “जन गण मन या गीतांस राष्ट्रगीत आणि “वंदे मातरम्” या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून दिनांक २४ जानेवारी, १९५० रोजी संविधान सभेने मान्यता दिली होती.
आजही अनेक शासकीय कार्यालयात संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते.काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते.वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांना सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात.महाराष्ट्रात नमस्कार सारखे संबोधनात्मक शब्द आजही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात.त्याशिवाय हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात.वेगवेगळे समूह, समुदाय,धर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत.वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे.
शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करायचे याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत, तथापि पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना “हॅलो” हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला व संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जागवणारा केवळ एक औपचारिक अभिवादन करणारा शब्द आहे.शासकीय निमशासकीय कार्यालयांत प्राप्त होणाऱ्या दूरध्वनीवरील संभाषणाची सुरुवात बहुतेक वेळा “हॅलो” या शब्दाने होत असल्याने शासकीय/निमशासकीय कार्यालयांशी अभ्यागतांकडून संवाद साधताना जनतेप्रति अपेक्षित असणारी निकटता साधण्यात अडथळे येतात.त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हे औचित्य साधून शासकीय कार्यालयांतील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोर आल्यानंतर होणाऱ्या संवादाची सुरुवात जर “वंदे मातरम्” या अभिवादनाने केली तर संवादकर्त्यांमध्ये परस्परांप्रति एक आपुलकीची भावना निर्माण होऊन पुढील संवाद निश्चितच सकारात्मक होण्यास मदत होऊन त्यातून एक नवीन ऊर्जा मिळू शकेल.तसेच “हॅलो” सारख्या निरर्थक शब्दांचा वापर थांबून राष्ट्राप्रति आदर व्यक्त करणा-या एकसमान शब्दोच्चाराची सवय आपोआपच वृद्धिंगत होईल. राज्यातील हा उपक्रम अन्य राज्यांकरिताही मार्गदर्शक ठरू शकेल.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हे औचित्य साधून सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयति दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात “हॅलो ऐवजी “वंदे मातरम्” या अभिवादनाने करण्यात यावी असे आवाहन या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना करण्यात येत आहे.”वंदे मातरम्” या अभिवादनाने दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात करणे बंधनकारक नसले तरी या आवाहनास प्रतिसाद देऊन “वंदे मातरम्” या अभिवादनाने दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात स्वयंप्रेरणेने करण्याबाबत सर्व विभागांनी कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे
1) सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/अनुदानित/अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था,शाळा/महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांत दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्” या अभिवादनाने सुरुवात करण्यात यावी,तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संवाद “साधतानाही “वंदे मातरम्” असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करण्यात यावे.
2) कार्यालयांत/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात वंदे मातरम्” ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
3) ज्या ठिकाणी स्वयंचलित दुरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
5) विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ती “वंदे मातरम्” या शब्दांनी करावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
5) व्यापक जनसंपर्क असणाऱ्या यंत्रणांनी “वंदे मातरम् अभिवादनाचा अधिकाधिक वापर करावा, उदा. राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकावरील उद्घोषणांची सुरुवात,अंगणवाडी,आरोग्यसेविका यांच्याकडून विविध समाजघटकांशी होणाच्या दैनंदिन संवादाची सुरुवात इत्यादी.
अभियानाची प्रचार आणि प्रसिद्धी
1) “वंदे मातरम्” अभिवादन अभियानासाठी वृत्तपत्रे, वाहिन्या, समाज माध्यमे इत्यादींमधून महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय यांनी माहिती प्रसृत करावी. तसेच “वंदे मातरम्” अभिवादन वापराबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी दृक श्राव्य माध्यमातून प्रचार- प्रसार करावा.
2) “वंदे मातरम्” या अभिवादानात्मक शब्दांनी सर्वांनी संभाषण, समेस सुरुवात करण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार प्रसिद्ध करण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनीही विशेष अभियान राबवावे.
3) लघुचित्रपटांच्या माध्यमातून “वंदे मातरम्” अभिवादनाबाबत जाणीव जागृती करावी.
4) वंदे मातरम्” हा फक्त नारा किंवा अभिवादन नसून यामागील राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावा.
सर्व शासकीय कार्यालये / निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विनाअनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना “वंदे मातरम्” अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन या परिपत्रकाद्वारे करण्यात येत आहे.